अहमदनगरमधील अकोले येथील चिंचवणे या छोट्याशा गावात राहणारा संजय डगळे (२९) चार वर्षांपूर्वी मुंबईत आला. घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं मुंबईत येऊन काही तरी करायचं, चांगली नोकरी मिळवायची हेच त्याचं स्वप्न. पण नोकरीतून काही मनासारखा पैसा मिळेना ना समाधान. म्हणून संजयनं टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ भाजी विकायला सुरूवात केली.
भाजी व्यवसाय चांगला चालू लागल्यानं आता हक्काचं घर हवं असं म्हणत त्यानं त्यादृष्टीनं प्रयत्न केलं. त्यातच म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी जाहीर झाली. त्यात त्यानं अर्ज केला नि शनिवारी संजयला खऱ्या अर्थानं लाॅटरी लागली. कोकण मंडळातील कल्याण, खोणी इथलं घर त्याला लागलं असून आता त्याच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा हा एकमेव पर्याय सर्वसामान्यांसाठी असतो. त्यामुळं अत्यल्प आणि अल्प गटातील इच्छुकच म्हाडाकडे मोठ्या प्रमाणावर घरासाठी अर्ज करतात. त्यातील अनेकांचं स्वप्न पूर्ण होतं. त्यात आता संजयचाही समावेश झाला आहे. संजय सध्या मित्रासोबत टिटवाळ्यात भाड्याच्या घरात राहतो. तर टिटवाळा स्थानकाबाहेर भाजी विकतो. संजयनं पहिल्यांदाच घरासाठी अर्ज भरला. घर लागेल की नाही हीच धाकधुक मनात धरत संजयनं शुक्रवारी टिटवाळ्यावरून वांद्रयातील म्हाडा भवन गाठलं होतं.
कल्याण, खोणी, अनुसुचित जमाती, संकेत क्रमांक २७२ मधील घरांसाठीची लाॅटरी फुटली आणि त्यात संजयचं नाव झकळलं. नाव झळल्याबरोबर संजयचा आनंद गगनात मावेनासा झाला. एका छोट्याशा गावात आलेल्या मुलाचं मुंबईच्या जवळ हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हणत संजयनं आपला आनंद व्यक्त केला आहे. आता घराचा ताबा मिळाल्यानंतर संजय कल्याण, खोणीलाच स्थायिक होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तिथेही तो भाजी विकण्याचाच व्यवसाय करणार आहे. तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता हक्काचं घर झाल्यानं आता तो लग्नाच्या बोहल्यावरही चढणार आहे.
संजयप्रमाणेच प्रमिला दवणे या जन्मापासूनच मुकबधीर असलेल्या तरूणीचंही २८ व्या वर्षीचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. प्रमिला जन्मापासून मुकबधीर असली तरी तिनं आणि तिच्या आई-वडिलांनी परिस्थितीपुढं हार मानली नाही. प्रमिलाला दादरमधील मुकबधीर मुलांच्या शाळेत घातलं. तिनं तिथं दहावीपर्यंतचं शिक्षण उत्तमप्रकारे पूर्ण केलं. त्यानंतर तिनं एसएनडीटी महाविद्यालयातून चित्रकला विषयात पदवी मिळवली. यावरच ती थांबली नाही तर तिनं पुढं अॅनिमेशन या विषयावरील एक कोर्स पूर्ण केला आणि वांद्रयातील दिव्यांगांसाठीच्या अलीयावर जंग संस्थेत नोकरी मिळवली. आता प्रमिला आपल्यासारख्याच मुलांना या संस्थेत प्रशिक्षण देत आहे.
दिव्यांगांना प्रेरणा देणारा असा प्रमिलाचा आतापर्यंतचा प्रवास. अशातच प्रमिला आणि तिच्या वडीलांना वाटलं की आता प्रमिलाचं ही हक्काचं घर असावं. सध्या त्यांचं कुटुंब दादरमधील पोलिस वसाहतीत राहत आहे. त्यामुळं तिने अंध-अपंग कोट्यातून अत्यल्प गटातील विरार-बोळींजमधील घरासाठी अर्ज केला होता. पहिल्यांदाच अर्ज केला आणि तिला नशीबानं साथ दिली नि तिला घरं लागलं.
घरं लागल्याचा आनंद इतका मोठा होता की त्यासाठी बोलण्याची, शब्दाची वा कुठल्याही भाषेची गरज नव्हती. कारण तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता, तिच्या डोळ्यात दिसत होता. शरीरात काही कमी असली की ही कमी मेंदु कलेच्या वा विशेष गुणाच्या रूपाने भरून काढतो असं म्हणतात आणि हेच प्रमिलाच्या रूपानं प्रकर्षानं समोर आलं.
प्रमिलाला बोलता येत नाही, एेकू येत नाही, मग तिचा हा आनंद तिन आपल्या कलेतून आपल्या बुद्धीतून व्यक्त केला. त्यासाठी तिनं चित्रकलेचा आधार घेतला. प्रमिलानं तिथल्या तिथे म्हाडा भवनातच चित्र काढतं घर लागल्याचा आनंद किती आणि कसा मोठा आहे हे सांगत म्हाडाचेही विशेष आभार मानले. त्यामुळं प्रमिलाचंही मोठं कौतुक लाॅटरीच्या वेळेस होताना दिसलं.
हेही वाचा -
गोंधळाच्या वातावरणात फुटली म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी
खूशखबर! नोव्हेंबरमध्ये १००० घरांची लॉटरी!