गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एकच प्रश्न असतो तो म्हणजे मूर्ती कुठली निवडावी. यापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या मूर्ती आपण निवडायचो. पण पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे आता शाडू मातीच्या गणपती मूर्तींचा पर्यायदेखील उपलब्ध झाला आहे. पण तरीही अनेक जण आजही प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती निवडतात. अगदी मुठभर असतील जे घरात इको फ्रेंडली बाप्पाचं स्वागत करतात.
अनेकांना आजही इको फ्रेंडली मूर्ती का निवडवावी असा प्रश्न पडतो. १० दिवस बाप्पा येणार त्यासाठी एवढा खटाटोप कशाला? असाच तुमचा दृष्टीकोन तर नाही ना? असेल तर हा दृष्टीकोन बदला. इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती का निवडावी? या मागे नेमकी काय कारणं आहेत? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) प्लास्टर ऑफ पॅरीसमध्ये जिप्सम, सल्फर, मॅग्नेशियम, शिसे आणि फॉस्फरस असे अनेक विषारी घटक असतात. या विषारी घटकांमुळे पाणी दुषित होते. याशिवाय पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाणदेखील कमी होते. प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती समुद्रात विसर्जित केल्यावर त्यातील जैविक घटकांवर देखील याचा परिणाम होतो.
२) इको फ्रेंडली मूर्ती १ तासाच्या आत पाण्यात विरघळून जातात. पण प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती अनेक महिने पाण्यात राहून देखील पूर्णत: विरघळत नाहीत. विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीचे अवशेष हे समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी पाहायला मिळतात.
३) प्लास्टर ऑफ पॅरीसचे विघटन झाल्यानंतर राहिलेली माती तळाला जाऊन एक प्रकारचा जाड थर तयार होतो. त्यामुळे तलावाचे पाणलोट क्षेत्र कमी होते.
४) प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती समुद्रात किंवा नद्यांमध्ये विसर्जित केल्याचा परिणाम हा माशांवर देखील होतो. याच पाण्यावर जगणारे मासे आपण खातो. त्यांच्या पोटात असणारे विषारी रसायनं आपल्या शरीरात जातात.
५) प्लास्टर ऑफ पॅरीसमुळे पाण्याचे प्रदुषण होते. त्यामुळे कॅन्सर, त्वचा रोग, श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते.
६) प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचे आपण विसर्जन तर करतोच. पण त्यासोबतच सजावटीच्या वस्तू जसे की थर्माकॉल, खोटी फुले, हार-तुरे अशा अनेक वस्तू आपण समुद्रात किंवा नदीत टाकतो. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणात आणखी वाढ होते.
७) प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवण्यात येणाऱ्या मूर्तींसाठी आर्टिफिशियल रंग वापरण्यात येतात. यातून निसर्गात विषारी घटक मिसळतात. या विरुद्ध इको फ्रेंडली गणपती बनवताना रंगांपासून ते सजावटीपर्यंत सर्वच वस्तू नैसर्गिक असतात. यामुळे कुठल्याच प्रकारचा नैसर्गिक ऱ्हास होत नाही.
हेही वाचा