कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. देशाचा फक्त जीडीपी घटला नाही तर भारत अन्य क्षेत्रातही घसरत आहे. इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (आयएमडी) ने सिंगापूर युनिव्हर्सिटी फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाइन (एसयूटीडी) च्या संयुक्त विद्यमाने २०२० स्मार्ट सिटी इंडेक्स जाहीर केला आहे. यामध्ये जगभरातील 'स्मार्ट सिटीज' (शहर) यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील चार शहरे आहेत. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा स्मार्ट सिटी रँकिंगमध्ये या शहरांची घसरण झाली आहे.
जागतिक 'स्मार्ट सिटीज'च्या यादीत नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या चार शहरांचा समावेश आहे. मात्र, या चार शहरांचा क्रमांक घसरला आहे. सिंगापूर या यादीत अव्वल स्थानावर आहे.
अहवालानुसार, यावर्षी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये हैदराबादचं ८५ वं स्थान आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये हे शहर ६७ व्या स्थानावर होतं. तर नवी दिल्लीला यावेळी ८६ वं स्थान मिळालं आहे. तर गेल्या वर्षी हे स्थान ६८ होतं. मुंबई यंदा ९३ व्या क्रमांकावर आहेत तर २०१९ मध्ये मुंबई ७८ व्या स्थानावर होती. तर बेंगळुरूने ९५ वं स्थान मिळवलं आहे.
अहवालात म्हटलं आहे की, नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू यांचं स्थान घसरण्याचं कारण म्हणजे या शहरांमध्ये तांत्रिक विकास झालेला नाही. या शहरांमध्ये कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. तसंच या शहरांमध्ये कोरोना बळीची संख्या सर्वाधिक आहे.
स्मार्ट सिटी इंडेक्स २०२० मधील अव्वल १० शहरं
१- सिंगापूर
२- हेलसिंकी
३- ज्यूरिख
४- ऑकलंड
५- ओस्लो
६- कोपेनहेगन
७- जिनिव्हा
८- ताइपे
९- आम्सटरडॅम
१० - न्यूयॉर्क