हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ती खेळत होती...
पावसाला रिमझिम सुरूवात झाल्यावर अाजूबाजूच्या हिरवळीकडे पाहून आपसूकच या ओळी ओठांवर येतात. पाऊस म्हणजे ट्रेकर्सचा आवडता ऋतू काळ्या कातळावर हिरवे गालिचे जेव्हा आपलं अस्तित्व पसरू लागतात, तेव्हा ट्रेकर्सला वेध लागतात, ते निसर्गसानिध्यात भटकंती करण्याचे.
खळखळ वाहणारा पांढराशुभ्र धबधबा, ढगांनी झाकलेले डोंगरमाथे, सर्वत्र पसरलेली हिरवळ या सर्वाचा मनमुराद आनंद लुटायला कुणाला नाही आवडणार. लोणावळा-खंडाळा-महाबळेश्वर-सिंहगड अशा ठिकाणी ट्रेकर्सची नेहमीच गर्दी होते. त्यामुळे आम्ही तुम्हाला मुंबईजवळील अशा काही ट्रेकिंग पॉईंट्सची माहिती देत आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंगचा मनमुराद आस्वाद लुटता येईल. अर्थात ट्रेकिंग करताना तुम्ही स्वत:ची योग्य ती काळजी देखील घेतली पाहिजे.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून दगडातून कोरून काढलेला एक जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकाराचं बांधकाम केलेलं आहे.या नरसाळ्यालाच कोथळीगड असं म्हणतात.
पेठ गावाच्या निकटतेमुळे याला पेठ गावचा किल्ला देखील म्हणतात. हा किल्ला कोथळा या नावानं देखील ओळखला जातो. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यासाठी केला जात असे.
१) कर्जत (पू.) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवली बस आहे. हे अंतर साधारण ३० किमी. आहे. आंबिवलीजवळ छोटं तळं आहे. तिथूनच पायथ्यावर पोहोचण्यासाठी चढ लागतो.
२) नेरळहून येताना कशेळे या गावी यावं. जामरुखची एसटी पकडून आंबिवली गावात यावं. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाच्या पायथ्याशी पेठ हे गाव आहे.
नाव: कोथळीगड
उपनाव: पेठचा किल्ला
तालुका: कर्जच, जिल्हा-रायगड
उंची: ४७२ मीटर( १५५० फूट)
प्रकार: गिरिदूर्ग
डोंगररांग: कर्जत-भीमाशंकर
मध्ययुगीन काळी नालासोपारा, चौल, भडोच आदी बंदरातून देशोदेशींच्या मालाची नाणेघाटातून जुन्नरच्या बाजारपेठेत ने-आण व्हायची. या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी त्यावेळी शिवनेरी, चावंड, हडसर,जीवधन,भैरवगड अशी दुर्गश्रृंखला तयार केली होती. यातीलच एक किल्ला म्हणजे चावंड!
ऐतिहासिक संदर्भात १९८७ साली मलिक अहमद या निजाम राजानं हा किल्ला जिंकल्याचा उल्लेख आढळतो. पुढे शहाजी राजांच्या वतनदारीत १६३७ पर्यंत हा किल्ला त्यांच्यात ताब्यात होता. महाराजांनी त्याचं नाव प्रसन्नगड ठेवलं. नंतर हा किल्ला मोगलांकडे गेला.१६७२-७३ दरम्यान तो हडसरसह स्वराज्यात आला. राजारामाच्या काळात तो पुन्हा मोगलांकडे गेला. पेशवाईत मात्र तो मराठ्यांकडे होता.
तुम्हाला जर चावंड गडावरील या सर्व ठिकाणांचं दर्शन घ्यायचं असेल तर 'स्वास्थ्यरंग गडभेट' तर्फे आयोजित ट्रेकमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. १ जुलैला चावंड या गडावर ट्रेक जाणार असल्याची माहिती 'स्वास्थ्यरंग गडभेट'चे संस्थापक डॉ. तेजस लोखंडे यांनी दिली.
नाशिकहून चावंडला जाण्यासाठी प्रथम जुन्नर शहर गाठावं. मग तिथून आपटाळे-घाटघर रस्त्यावर १५ किमीवरील चावंडवाडी फाट्यापर्यंत यावं. स्वत:ची गाडी असेल तर उत्तम. नाहीतर जुन्नरहून बस आणि खाजगी काळ्या-पिवळ्या गाड्या सोईनं उपलब्ध आहेत.
नाव: किल्ले चावंड
उपनाव: प्रसन्नगड, जुंड
ठिकाण: तालुका-जुन्नर, जिल्हा-पुणे
उंची: १०६५ मीटर (३४९५ फूट)
प्रकार: गिरीदूर्ग
डोंगररांग: नाणेघाट
मुंबईतील निसर्गप्रेमींचं आवडतं ठिकाण म्हणजे किल्ले माहुली. ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. अनेक सुळके असलेला लांबलचक हा डोंगर माहुली नावानं ओळखला जातो. माहुलीचे २ खोगिरामुळे तीन भार पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.
भक्कम किल्ला म्हणून ओळख असलेल्या माहुली किल्ल्यावर जिजामातांचा मुक्काम काही काळ होता. जिजामातांनी गरोदरपणाच्या काळी या किल्ल्यावर वास्तव्य केलं होतं. ऐतिहासिक दृष्ट्या या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. हेच महत्त्व ओळखून आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी माहुली गावाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
१) मुंबई-नाशिक लोहमार्गावरील आसनगाव गाठावं. आसनगावहून रिक्षानं माहुली गावी जाता येतं. माहुली गावात तुमची जेवणाची सोय होईल.
२) आसनगाव रेल्वे स्टेशनवरून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणं. शहापूर गावातून माहुलीच्या पायथ्याशी जाण्यासाठी रिक्षा असतात.
नाव: माहुलीगड
ठिकाण: ठाणे
उंची: २८०० फूट
प्रकार: गिरीदूर्ग
जवळचं गाव: माहुली
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत १६४७ मध्ये सर्वप्रथम ताबा घेतलेला किल्ला हाच. शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून या किल्ल्याचं नाव'तोरणा' किल्ला असं ठेवण्यात आलं आहे. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचं नांव बदलून 'प्रचंडगड' असं ठेवलं. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.
१) तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. राजगड किल्ल्याकडून तसेच भट्टी या गावातूनही गड चढता येतो. परंतु वेल्हा इथून जाणं सोपं आहे.
२) मुंबई-पुणे-शिवापूर-वेल्हा हे १९९ किलोमीटर आहे. तुम्ही पुण्यापर्यंत रेल्वेनं जायचं. पुण्याहून तुम्ही खाजगी वाहनं करून वेल्हाला जाऊ शकता.
नाव: तोरणा
उपनाव: प्रचंडगड
उंची: १४०३ मीटर / ४६०४ फूट
प्रकार: गिरिदूर्ग
ठिकाण: तालुका - वेल्हे, जिल्हा - पुणे
जवळील गाव: पुणे
डोंगररांग: सह्याद्री
एका दिवसाच्या ट्रेकसाठी पेबसारखी जवळची आणि निसर्गरम्य जागा शोधून सापडणार नाही. किल्ला चढण्यासाठी लागणारा वेळ, चढण्याची वाट, गुहेची रचना, गुहेसमोरील निसर्गरम्य दृश्य अशा अनेक बाबतीत हा गड गोरखगडाशी साधर्म्य साधतो. हा किल्ला चढताना घनदाट जंगल लागतं.
पेबच्या किल्ला विकटगड या नावानं देखील ओळखला जातो. या किल्ल्याचं मूळ नाव पेब हे पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडलं असावं. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता.
मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होतं. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला तर उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदान, पोल्ट्रीफार्म आणि घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणार्या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तिथून थोडं पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत.
या तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागतं. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसंच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधली मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे.
या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झर्यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावं लागतं. तिथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणार्यांनी वाटाडया घेणं हितकारक आहे.
नाव: पेबचा किल्ला
उपनाव: विकटगड
उंची: २१०० फूट
ठिकाण: कर्जतहून १९ किलोमीटर
प्रकार: गिरीदूर्ग
सो आम्ही सांगितलेल्या ट्रेकिंग पॉईंट्सला तुम्ही नक्की भेट द्याल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ट्रेकिंगमुळे तुम्ही निसर्गाच्या जवळ तर जाताच सोबतच तुम्हाला आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती मिळतं. पण मजा, मस्ती यासोबतच तुमच्या सुरक्षेकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात ट्रेकिंगला जाताना योग्य ती काळजी घेणं देखील आवश्यक आहे. ट्रेकला जाताना काय काळजी घेतली पाहिजे हे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा-
रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!