Advertisement

यंदा कर्तव्य नाही!

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. मग तिला त्याच पद्धतीने हॅण्डल का नाही केलं जात? फक्त वय झालं म्हणून 'करून टाका' असाच विचार केला जातो? अर्थात याला अपवादही आहेतच. म्हणजे प्रत्येकाच्या घरी हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला जातो. पण, आता ' झालीस लग्नाची, ''करून टाक'' हा अनाहूत सल्ला मात्र बुचकळ्यात टाकतो. 'लग्नाची होणं' म्हणजे नक्की काय? सांगेल का कुणी?

यंदा कर्तव्य नाही!
SHARES

'योग्य वेळी लग्न झालं म्हणजे मूल होताना काही अडचण येत नाही' हे ऐकून आता मला एवढा कंटाळा आलाय म्हणून सांगू... असं वाटत कुठेतरी पळून जावं, म्हणजे हे लग्नाचं भूत तरी घरच्यांच्या डोक्यातून निघून जाईल. इथे लग्नासाठी हवा तसा मुलगा मिळत नाही आणि माझ्या आजीला लग्नानंतर होण्याऱ्या पोराबाळांचं पडलंय.' माझी मैत्रीण हे मला तावातावात सांगत होती आणि मला जाम हसायला येत होतं. पण अशा गोष्टी मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींकडून ऐकल्या आहेत. अर्थात मीही माझ्या घरी हे बऱ्याचदा ऐकते. म्हणजे एकदा काय मुलगा शिकला आणि चांगल्या जॉबला लागला तर "काय मग पेढे कधी?" आणि मुलीचं शिक्षण झालं की, "मग यंदा कर्तव्य आहे का?" हे प्रश्न कुठल्याही फॅमिली फंक्शनला गेले आणि कोणी विचारला नाही असं होणारच नाही.



लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. मग तिला त्याच पद्धतीने हॅण्डल का नाही केलं जात? फक्त वय झालं म्हणून 'करून टाका' असाच विचार केला जातो? अर्थात याला अपवादही आहेतच. म्हणजे प्रत्येकाच्या घरी हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला जातो. पण, आता ' झालीस लग्नाची, ''करून टाक'' हा अनाहूत सल्ला मात्र बुचकळ्यात टाकतो. 'लग्नाची होणं' म्हणजे नक्की काय? सांगेल का कुणी?

या विषयावर लिहिणार आहे असं जेव्हा मी काही लोकांना आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगितलं आणि त्यांचा अनुभव विचारला तेव्हा, ''आम्ही तर ह्यावर निबंध लिहू शकतो'' असं उत्तर आणि सोबत ढीगभर अनुभवांचं गाठोडंच अनेकांनी बाहेर काढलं.

''अगं आता २७ वर्षाची झालीस, लग्न उरकून टाक' हे हल्ली मी ऐकते. मला सांगा, लग्न काय उरकायची गोष्ट आहे? माझ्यासाठी लग्न म्हणजे फार मोठा डिसीजन होता. पण आता सगळं उरकून टाकण्यावर आलंय. आयुष्याची जवळजवळ १७ वर्ष चांगलं करियर व्हावं म्हणून शिक्षणासाठी घालवली. पण त्यावरही सगळ्यांचं उत्तर हेच असतं, ''करिअर होतच राहील गं... पण लग्न कर आधी''. मी लग्नासाठी मुलंही बघतेय. हवा तास मुलगा मिळाला की ते करणारच आहे. पण तोपर्यंत हे असं सगळं बोलत सारखं पाठी लागणं म्हणजे खरंच डोकेदुखी आहे.''
श्वेतांबरा सावंत

"माझं वय आता २९ आहे. मी लग्नासाठी मुली पाहायलाही सुरूवात केली आहे. म्हणजे आतापर्यंत २ मुली पाहिल्या. पण काही जमलं नाही. पण मला लोकांची बोलणी ऐकून असं वाटायला लागलंय की, आता यावर्षी जर माझं लग्न नाही झालं तर कधीच होणार नाही. अरे यार, लग्न करायचं म्हणून करायचं किंवा वय झालंय म्हणून करायची गोष्ट आहे का? जी मुलगी आहे तिच्याबरोबर मला आयुष्यभर राहायचं मग किमान तिच्याबरोबर आपलं जमेल का, हे पाहायला नको? त्यासाठी अशी घाई करून कसं चालेल? घाईघाईत करून नंतर प्रॉब्लेम होण्यापेक्षा थोडं उशिरा होऊन चांगलं स्थळ मिळालेलं बरं नाही का ?"
किरण मोहिते



"माझ्या घरी सध्या लग्न म्हणजे हॉट टॉपिक आहे. घरातले सारखे विचारतात ह्यावर्षी तरी तुला लग्न करायचं आहे की नाही? मी नाही म्हणालो किंवा काही प्रतिक्रिया नाही दिली तर, मग लगेच 'तुझं काही आहे का बाहेर'? हा पुढचा प्रश्न तयार असतोच. मी तर हल्ली फॅमिली फंक्शन्सनांपण जाणं कमी केलंय. एकवेळ घरच्यांना उत्तर देत बसू. पण नातेवाईकांचं काय? कुणाकुणाला आणि कशी उत्तरं देणार त्यांनी विचारलेल्या ''काय मग, यंदा कर्तव्य आहे की नाही?" ह्या प्रश्नाला. लग्न ही माझ्यासाठी काय सगळ्यांसाठीच महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मनाची तयारी असणंही महत्वाचं आहे Mental आणि Financial बाजूंनी तयार असणं गरजेचं आहे."
अमित मयेकर

''Now I am just 27 ' JUST 27 म्हणतोय. कारण हे माझ्यासाठी तरी लग्नाचं वय नाही. पण मी गेल्या ३ वर्षांपासून जॉब करतोय आणि आता 'सेट झालायस तर लग्न करून टाक', हे मला सतत ऐकावं लागतंय. आजी-आजोबांपासून काका-काकी पर्यंत सगळ्यांचंच हे सांगणं असतं की, चांगला पर्मनंट जॉब आहे, स्वतःचं घर आहे मग आता लग्न करायला काय हरकत? लग्न करायला हवं, हे मलाही मान्य आहे. पण त्यासाठी अशी भुणभुण लावणं मला पटत नाही. जॉब आहे, घर आहे पण मानसिक तयारी असणंही तेवढंच महत्वाचं आहे."
महेश भोंदे



"लग्न हा विषय खूप नाजूक आहे आणि अशा वेळी तुमच्या घरच्यांनी तुम्हाला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूचे लोकच, खासकरून नातेवाईक जेव्हा आपल्या घरच्यांना आणि आपल्याला सारखी तीच गोष्ट विचारायला लागले की irritate व्हायला होतं. माझ्या वयाची ३० वर्ष उलटली आहेत आणि लग्नासाठी मी मुलं बघतेय. पण शिक्षण आणि इतर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी मॅच होत नाहीत. मग गोष्ट पुढे सरकत नाही. पण माझ्या घरच्यांनी कधीच या गोष्टीचा बाऊ केला नाही. पण नातेवाईक सतत त्याच गोष्टीबद्दल विचारतात आणि नकळत याचं प्रेशर यायला लागतं."
चैतन्या सोनावणे

मला तर वाटतं आपल्या घरच्यांपेक्षा आपल्या नातेवाईक आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनाच आपल्या लग्नाची जास्त काळजी असते. म्हणजे आई-वडीलही आपल्या लग्नाचा एवढा विचार करत नाहीत. पण हे नातेवाईक आणि शेजारी असं काही पिल्लू त्यांच्या डोक्यात सोडतात की, बस रे बस... म्हणजे आपलं लग्न हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि ते नाही झालं तर मग सगळं संपलंच. बरं हे विचारणाऱ्या प्रत्येकाला आपली काळजी आहे म्हणूनच हे विचारतात असंही नसावं. स्वतःच्या मुलांची लग्न वेळेवर झाली की, मग दुस-यांना विचारणं खूप सोपं जात. बरं, आम्हाला लग्न करायचं नाही का? तर तसंही काही नाही. अहो, पण नीट आवडेल असा जोडीदार तर मिळू देत. मग करू की...


लग्नाचा विषय निघाला की घरच्यांची ठरलेली वाक्य:

  • आता नाही मग कधी? म्हातारी / म्हातारा झाल्यावर करायचं का ?
  • वय निघून गेलं तर?
  • बाहेर काही असेल तर आताच सांग .
  • वेळेत लग्न झालं तर मुलं वेळेत होतात.
  • जास्त उशीर केलास तर कुणीतरी म्हातारंच मिळेल.



या खूप वर्ष आधीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत. आपण आपल्या वेळेनुसार बदलत आहोत. मग ही गोष्ट अजूनही तशीच का? बरं याबद्दल फक्त विचारून किंवा बोलून विषय संपत नाही, तर त्या पुढे जाऊन इमोशनली ब्लॅकमेलही केलं जातं.

  • तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे , मग आमचं काहीही झालं तरी चालेल.
  • तुझं लग्न झाल्याशिवाय मला शांत झोप लागणार नाही.
  • तुझ्या लग्नाची खूप मोठी जबाबदारी आहे आमच्यावर ती व्यवस्थित पार पाडायलाच हवी.



लग्न करण्यासाठी वय , नोकरी आणि शिक्षण आदींबरोबरच खूप महत्वाची गोष्ट लागते. ती म्हणजे स्वतःची मानसिक तयारी. तुम्ही मानसिकरित्या जर तयार नसाल तर लग्नानंतर त्याचे परिणाम दिसायला लागतात. अशी उदाहरणं तुम्हीही तुमच्या आजूबाजूला पहिली असतील. लग्न ही आयुष्यातली मोठी घटना असली तरीही ती केवळ वय झालं म्हणून करण्यासारखी बाब नाही. हे मुलामुलींबरोबर त्याच्या घरच्यांना आणि खासकरून त्यांना सतत लग्नाबद्दल विचारणाऱ्या नातेवाईकांनाही समजायला हवं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा