सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. या कायद्याचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी देखील रस्त्यांवर उतरत आहेत. परंतु देशात काही गटांकडून जाणीवपूर्वक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. अशातच पोलिसांकडून विद्यार्थ्यांनाही अमानुषपणे लक्ष्य केलं जात आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रेणुका शहाणे व्यक्त झाल्या आहेत. भाजपची आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गँग असल्याची खरमरीत टीका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली आहे.
हेही वाचा- जामिया हिंसाचार: अक्षयने चुकून केलं ‘या’ व्हिडिओला लाईक, झाला पश्चाताप
सुधारित नागरिकत्व कायद्याचा निषेध करण्यासाठी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी रविवारी रस्त्यावर उतरले असता पोलिसांच्या कारवाईदरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. ठिकठिकाणी जाळपोळ झाली. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांची धरपकड केली. यावेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच धुमश्चक्री झाली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेचा देशभरातील विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात येत आहे.
या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेली हिंसक निदर्शने खूपच दुर्दैवी आणि त्रासदायक आहेत. वादविवाद, चर्चा आणि मतभेद लोकशाहीचा भाग आहेत. परंतु सरकारी मालमत्तेचं नुकसान करून दैनंदिन आयुष्यात बाधा निर्माण करणं नैतिकतेला धरून नाही.
हेही वाचा- CAB: महाराष्ट्रात ‘कॅब’च्या विरोधात काँग्रेस, शिवसेना काय करणार?
Sir, please ask people to stay away from all your IT cell Twitter handles then. They spread the most amount of rumours, falsehoods and are totally against brotherhood, peace and unity. The real."tukde tukde" gang is your IT cell sir. Please stop them from spreading hate 🙏🏽🙏🏽 https://t.co/bMaXDFnvsP
— Renuka Shahane (@renukash) December 16, 2019
त्यावर प्रतिक्रिया देताना रेणुका शहाणे यांनी, सर तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हँडलपासून सर्वसामान्यांना लांब राहायला सांगा. या हँडवरूनच सर्वात जास्त अफवा, खोटी माहिती पसरवण्यात येते. ही माहिती देशाच्या बंधुत्वाला, शांततेला आणि एकात्मतेला मारक आहे. सर, तुमची आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा. तेव्हाच देशात शांतता पसरेल. असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे.