येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत जाऊन प्रचार करण्याचा कार्यक्रम शिवसेनेने आखला आहे. त्यावर टीका करताना घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. मुंबईकर जनता अनेक प्रश्नांचा जाब विचारणारच आहे! असा टोला भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, मुंबई महापालिका (bmc) निवडणुकीच्या आधीच पायाखालची वाळू घसरायला लागलीय हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपला कार्यक्रम जाहीर केला आहे. जरूर घराघरांत गेलं पाहिजे. पण या घराघरांतून एकच आवाज येईल, की लाॅकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा आम्ही घरात होतो, त्यावेळेला तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते कुठं होते? लाॅकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला जीवनावश्यक वस्तू मिळत नव्हत्या तेव्हा मुख्यमंत्री आणि तुमच्या मंत्रालयातील इतर मंत्री कुठं गायब झाले होते? याचं उत्तर द्यावं लागेल.
हेही वाचा- नाहीतर आपण लाॅकडाऊनच्या दिशेने जाऊ- महापौर
घरोघरी जाताय? चांगले आहे, मुंबईकर जनता अनेक प्रश्नांचा जाब विचारणारच आहे!@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/97cJZKNFR8
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 17, 2021
तुम्ही घरोघरी गेल्यावर लोकं तुम्हाला विचारतील की लाखो रुपयांचा एनए टॅक्स जनतेच्या डोक्यावर टाकताय आणि बिल्डरांना ५० टक्के प्रीमियम माफ करताय हा लोड तुम्ही का घेतला? समुद्राचं पाणी गोडं करायला निघालात, पण पावसाचं पाणी घरात घुसतं त्यासाठी काय योजना आहे? अवाजवी वाढीव वीज बिलं पाठवून सर्वसामान्यांना का छळताय? बिल्डर, दारूवाले, टाटांना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना (mumbai) काय दिलंत? असे बरेच हिशेब मुंबईकरांचे बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही घरोघरी गेल्यास यांचा जाब विचारल्याशिवाय मुंबईकर राहणार नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर देण्यासाठी शिवसेना (shiv sena) सातत्याने नवनवीन रणनिती आखत आहे. घरोघरी शिवसेना हा उपक्रम शिवसेना हाती घेत असून याआधी मुंबईतील गुजराती-मारवाडी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना जागोजागी मेळावे घेत आहे.
(ashish shelar criticized shiv sena door to door campaign in mumbai ahead of bmc election)