राज्य सरकारकडून बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. यावरून छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत, नाकाबंदी करायला काय तालीबानी येणार आहेत का? असा प्रश्न विचारत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर हँडलवर टाकलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर म्हणतात की, महाराष्ट्राची शान आणि भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बैलगाडा छकडा शर्यतीचं छळ कपटानं नामोनिशाण मिटवायला हे राष्ट्रवादीचे लोकं निघाले आहेत. यांना मागील दोन वर्षांपासून माझी ना तारीख घेता आली, ना अध्यादेश काढता आला. जेव्हा मी स्पर्धेचं आयोजन केलं, तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसमोर बैठका घेऊन असं भासवलं की आमचा छकडा शर्यतीला विरोध नाही.
हेही वाचा- बुलेट ट्रेनच्या विषयावर उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार- रावसाहेब दानवे
#राष्ट्रवादी_कॉंग्रेसच्या लोकांनी
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) August 17, 2021
सुरूवातीला शेतकऱ्यांसमोर बैठका घेऊन असे भासवले की छकडा शर्यतीला विरोध नाही. आणि आता हे गृहखात्याच्या बळाचा वापर करून #छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत, नाकाबंदी करायला काय #तालीबानी येणार आहेत का? pic.twitter.com/EpLF3S98oP
परंतु हे अखत्यारित असलेल्या गृहखात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा छकडा शर्यतीच्या स्थानावर नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहेत. आज १७ तारखेपासूनच सगळीकडे नाकाबंदी करण्याचे आदेश त्यांनी काढलेले आहेत. अरे, इथे बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत. अफगाणिस्तानवरून तालिबानी तर येणार नाहीत. इतका बंदोबस्त लावून तुम्ही शेतकऱ्यांचा विश्वासघात करताय.
मुळामध्ये आम्हाला या विषयात कुठलं राजकारण आणायचं नाही. बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. म्हणून तुमची दुटप्पी-दुतोंडी भूमिका आता शेतकऱ्यांसमोर उघडी पडतेय. बैलगाडा शर्यतीला तुमचं पाठबळ असेल, तर तुम्ही सगळेजण या विषयामध्ये मदत करा. शेतकऱ्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही ताकतीने या विषयामध्ये उतरा. आपण जर ताकदीने उतरलो तरच आपला बैल वाचेल, आपला गोवंश वाचेल आणि आपल्या बैलगाडा शर्यती चालू होतील, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.