शरजील उस्मानीच्या अटकेवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. शिवसेनेचं (shivsena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनात शर्जीलला बेड्या पडतील! निश्चिंत रहा, आवर अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर टीका करताना आधी सेक्युलर ए आझम पवारांची परवानगी घेतली आहे ना? असा खोचक सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
शर्जीलला बेड्या पडतील, निश्चिंत रहा म्हणून अग्रलेखातून केलेली फेकाफेक ठीक आहे, पण अबू आझमीची आणि सेक्युलर ए आझम पवारांची परवानगी घेतली आहे ना? असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या. तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातले हिंदुत्व कसं सडलं आहे यावर प्रवचन झोडलं.
हेही वाचा- तुम्ही हिंदुत्व का सोडलं एवढंच सांगा, फडणवीसांचा शिवसेनेला टोला
शर्जीलला बेड्या पडतील, निश्चिंत रहा म्हणून अग्रलेखातून केलेली फेकाफेक ठीक आहे, पण अबू आझमीची आणि सेक्युलर ए आझम पवारांची परवानगी घेतली आहे ना? pic.twitter.com/IoftDFc0U2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 4, 2021
त्यावर भाजपने (bjp) आता आरोळ्या ठोकायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वासाठी रस्त्यावर येऊ असं त्यांनी जाहीर केलं आहे. उस्मानी जे बरळला ते गंभीर आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडलं आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचं एक पानही त्यांना खुडता आलं नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणं हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना माहीत नाही?
तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झालं!, असं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
(bjp mla atul bhatkhalkar criticized shiv sena and uddhav thackeray over sharjeel usmani arrest)