मुंबई शहरातील धोकादायक इमारती आणि चाळींची संख्या तब्बल 14 हजार एवढी आहे. अशा इमारतींमधील भाडेकरू कित्येक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन राहतात. त्यामुळे मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकासकरण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारती तसेच चाळींचा पुनर्विकास करण्यात यावा आणि तेथील भाडेकरूंना ५०० चौरस फुटांचे स्वतंत्र घर देण्यात यावे, अशी मागणी भाजपा प्रतोद राज पुरोहित यांनी मंगळवारी केली.
मुंबई शहरातील उपकरप्राप्त/ बिगर उपकरप्राप्त इमारती, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाशी संबधित इमारतींच्या बाबत तसेच मुंबईतील गृहनिर्माण धोरण ठरवण्याबाबत गृहनिर्माणचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्याची बैठक 19 सप्टेंबर रोजी झाली. त्यासंदर्भात राज पुरोहित यांनी आपल्या सूचना मंगळवारी पत्रकार परिषदेत मांडल्या.
झोपडपट्टीवासियांना 500 चौ. फुटांचे घर मिळण्यासाठी उपाय योजना करा. घरमालकांमुळे त्रस्त असलेल्या भाडेकरूनांही या इमारतींची थेट मालकी द्यावी. या संदर्भात अध्यादेश काढून घरमालकांचा अधिकार संपुष्टात आणावा आणि भाडेकरूंना त्यांचा मालकी हक्क द्यावा, मुंबईतील मराठी माणसांचा हा महत्त्वाचा प्रश्न असून, या मुद्द्यावर माझ्या पक्षातील सर्व नेते आणि कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत.
राज पुरोहित, आमदार, भाजपा
भाडेकरूंना घरमालकी हक्क देण्याबाबत महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम १९९९ मध्ये तरतूद नसल्याने भाडेकरू देत असलेल्या भाड्याच्या १०० पट रक्कम शासन दरबारी जमा करण्यासंबंधी मुंबईतील स्थानिक लोकप्रतिनिधींशी बैठक घेण्यात येईल तसेच न्यायालयात हे प्रकरण जलदगतीने चालवण्यासाठी वकिलांची नेमणूक करण्यात येईल, असे लक्षवेधीला उत्तर देताना शासनाने सांगितले होते. मात्र सरकारने एक अध्यादेश काढावा आणि सर्व उपकरप्राप्त इमारतींचे अधिग्रहण करावे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -
...आणि राज पुरोहित यांचा पारा चढला!