भाजपाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आता मोठं वक्तव्य करतं खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा संजय काकडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन कधीच दिलं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना केलं. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे आधीच खळबळ उडाली असताना आता संजय काकडे यांनीही खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचे ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात आहे, असं काकडे यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काकडे यांनी हा दावा केल्याने राजकीय वातावरण आता तापण्याची चिन्हं आहेत.
अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील समान वाटपाच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. त्यातच पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस आणि काकडे यांच्या या दाव्यांवर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलंच नव्हतं - देवेंद्र फडणवीस
मलाही न्याय मिळेल : एकनाथ खडसे