महाराष्ट्रातील जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांवरील कौल आता समोर आले आहेत. महायुतीला १६० जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला ९९ जागांवर यश मिळालं आहे.
२२० पेक्षा अधिक जागा मिळतील अशी अपेक्षा महायुतीला होती. मात्र, अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा महायुतीला मिळाल्या आहेत. भाजपाला १०३ आणि शिवसेनेला ५७ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये २०१४ च्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. राष्ट्रवादीला ५३ जागा मिळाल्या आहेत. तर ४६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अवघा एक उमेदवार निवडून आला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून प्रमोद (राजू) पाटील विजयी झाले असून त्यांच्या रुपाने मनसेने विधानसभेत खातं खोललं आहे. अपक्षांची संख्या २८ आहे.
या निवडणुकीत महायुतीच्या ६ मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे, पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, राम शिंदे , जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. परळीतून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. तर पहिल्यांदाच निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांचा दारूण पराभव केला. पुरंदरमधून शिवसेना नेते विजय शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला. तर शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमध्ये पराभव झाला आहे.
आयारामांनाही मतदारांनी मोठा झटका दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ३५ पैकी १९ उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपात आलेल्या वैभव पिचड (राष्ट्रवादी), हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), गोपालदास अग्रवाल (काँग्रेस), गोपिचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी), धैर्यशील कदम (काँग्रेस), रमेश आडसकर, भरत गावित, उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. तर दिलीप सोपल (राष्ट्रवादी), भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), शेखर गोरे (राष्ट्रवादी), रश्मी बागल (राष्ट्रवादी), विजय पाटील, संजय कोकाटे, दिलीप माने (काँग्रेस), नागनाथ क्षीरसागर, निर्मला गावित (काँग्रेस), प्रदीप शर्मा या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
हेही वाचा -
मुख्यमंत्री महायुतीचाच होणार : देवेंद्र फडणवीस
जिंकून मुंबईतील 'या' आमदाराने केला विक्रम