Advertisement

Bakra Eid: बकरी मंडीचा आग्रह नको- उद्धव ठाकरे

बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचं पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Bakra Eid: बकरी मंडीचा आग्रह नको- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोना संकटाशी मुकाबला करताना गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले आहेत. सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. त्यामुळे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचं पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (celebrate bakra eid in simple way says maharashtra cm uddhav thackeray) यांनी व्यक्त केली. बकरी ईद संदर्भात आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, आमदार अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्दीकी देखील उपस्थित होते.

हेही वाचा - गणेशोत्सवाला दिली तशी बकरी ईदलाही परवानगी द्या, ‘या’ नेत्याची मागणी

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचं मोठं आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणं हे महत्त्वाचं आहे. सण-उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ही गोष्ट टाळायला हवी. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण-उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको.

महाराष्ट्रातील सर्व जनतेने जात-पात, धर्म-पंथ न मानता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केलं. आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळालं. बकरी ईदमध्ये देखील असंच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरे करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचार देखील करणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, बकरी ईद निमित्त सर्वांनी सहकार्य करावं. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाईन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंन्मेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसंच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी, असं आवाहन केलं. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा