मराठा आरक्षणावरून अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सुरू असलेला गदारोळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही कायम आहे. मात्र पाचव्या दिवशी अधिवेशनात विरोधकांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधकांच्या मनात खोटं असून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत. पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाचं विधेयक सभागृहात मांडू, असं मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विधानसभेत खडसावलं. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपानंतर विरोधकांमध्येही संताप निर्माण झाला नि त्यांनी सभात्याग करत आपला संताप व्यक्त केला. एवढंच नव्हे, तर सभागृहाच्या पायऱ्यावर देखील सत्ताधारी आणि विरोधकांचा चांगलाच राडा झाला.
मराठा आरक्षणासाठी २९ नोव्हेंबरला सरकारने दोन्ही सभागृहात विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर विरोधक आधी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर ठाम असून यावरूनच मंगळवारीही विधानसभेत रणकंदन सुरू झालं. विरोधकांच्या अहवाल मांडण्याच्या भूमिकेवर आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विरोधक राजकारण करत असून विरोधकांच्या मनात मराठा आरक्षणावरून काळंबेरं असल्याचा गंभीर आरोप केला. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनादरम्यान विरोधकांना प्रचंड गोंधळ घातला, पण या गोंधळामध्येही मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा न सोडत विरोधकांना लक्ष्य केलं.
सरकार कायद्यानुसारच आरक्षणाची कार्यवाही करत असून अहवाल सभागृहात सादर करण्याची गरज नाही, तसं करण बंधनकारकही नसल्याची ठाम भूमिका घेत विरोधकांनी मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावली. तर सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यात येणार असल्याचाही त्यांनी पुरूच्चार केला. विरोधक समाजात तेढ निर्माण करत आहेत, समाजात भांडण लावत आहेत आणि मुस्लिम आरक्षणावरून विरोधकांनी फसवाफसवी केल्याचाही गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
हेही वाचा-
मराठा आरक्षण : सरकार विधेयकावर, तर विरोधक अहवालावर ठाम
धर्माच्या आधारे मुस्लिमांना आरक्षण नाही - राज्य सरकार