भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत भक्कम राज्यघटना लिहिली आहे. ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही. आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलूही देणार नाही. कारण आम्हाला गीता, बायबल आणि कुराणापेक्षाही भारतीय संविधान प्रिय असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते ठाण्यामध्ये आयोजित रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आरपीआय. आ.)च्या ६१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते.
इंदू मिल इथं डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकात डाॅ. आंबेडकरांचा पुतळाही उभारण्यात येत आहे. परंतु सध्या काहीजण या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप सरकारवर करत आहेत. आरोप करणाऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की सरकारने डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केलेली नाही. या पुतळ्याच्या उंचीपेक्षा बाबासाहेबांच्या विचाराची उंची एवढी मोठी आहे की ती कुणीच गाठू शकत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिलं.
एवढंच नाही, तर डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मिल परिसरातील झाडे तोडण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली असून तिथं जमीन सपाटीकरणाचं काम सुरू आहे. समुद्राचं पाणी इंदू मिलमध्ये येऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. या स्मारकासाठी एकूण ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण देताना समाजातील कुठल्याही घटकाचं आरक्षण करण्यात येणार नाही. शेवटच्या वंचितापर्यंत हे आरक्षण कायम राहील, ही सरकारची भूमिका असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हेही वाचा-
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी? आनंदराज आक्रमक, आंदोलनाचा इशारा
धक्कादायक! संभाजी भिडे यांना सरकारचं अभय, ६ गुन्हे घेतले मागे