राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महत्त्वाचं आवाहन केलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साधेपणानं साजरी करा, असं मुख्यमंत्र्यानं म्हटलं आहे. गणपती उत्सवादरम्यान जसं सहकार्य केलं त्याचप्रकारे नवरात्र, दसरा सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
येत्या १७ ते २५ ऑक्टोबरदरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी सण साजरा होणार आहेत. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणानं साजरा करावा. कोरोनासंदर्भातील सरकारनं जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचं पालन करावं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशातल्या ७ राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना स्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहभागी झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आपापल्या राज्यातली स्थिती सांगितली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचं कौतुक केलं.
पंतप्रधान म्हणाले, देशात ७०० जिल्हे आहेत आणि त्यात ७ राज्यांमधल्या फक्त ६० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातले २० जिल्हे आहेत ही चिंतेची बाब आहे. या जिल्ह्यांमधला कोरोनाचा प्रसार कसा आटोक्यात आणता येतील याची काळजी घ्या असला सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
हेही वाचा