इंधनाचे सातत्याने वाढणारे दर नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचं म्हणत काँग्रेसने रस्त्यावर उतरत केंद्राला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून १० सप्टेंबरला महागाईविरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसचे नेते अशोक गहलोत आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिल्लीत १० सप्टेंबरला 'भारत बंद'ची घोषणा केली आहे. या बंदला विरोधकांचाही पाठिंबा दिल्याचंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६,९१ रुपयांवर तर डिझेलचे दर प्रति लिटर ७५.९५ रूपयांवर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असतानाही देशात इंधनाचे दर वाढतच आहेत. वर्षभरापूर्वीचा विचार केला तर पेट्रोचे दर प्रति लिटर ७५ रुपयांच्या खाली होते, तर डिझेलचे दर प्रति लिटर ५५ रूपयांच्या आसपास होते.
वर्षभरात पेट्रोलचे दर ९० रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ८० रुपयांकडे कूच करत आहेत. या इंधन दरवाढीमुळं जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असून महागाई तोंड वर काढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच दिवसाचं बजेट कोसळलं आहे. केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.
केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची नामी संधी यानिमित्तानं काँग्रेसला मिळाल्यानं इंधन दरवाढीवर आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळंच १० सप्टेंबरला काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली आहे. देशभरात १० सप्टेंबरला कडकडीत बंद पाळण्यात येईल. ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात येतील, असंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, बहुतांश राज्यात भाजपाचं सरकार असून भाजपाने ठरवलं, पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत सहज टाकता येऊ शकतं. त्यामुळे सरकारने इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्यांची ही लूट तात्काळ थांबवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
हेही वाचा-
माझी ब्ल्यू प्रिंट कुणी वाचली तरी का? - राज ठाकरे
महिला आयोगाच्या दणक्यानंतर राम कदमांचा माफीनामा