राज्यातील काँग्रेसचे मात्तबर नेते हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब हाऊस येथे पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला.
इंदापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला. आजचा दिवस ऐतिहासिक सांगतानाच तत्त्वाने काम करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. तर हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये खूप उशिरा आले. लोकसभा निवडणुकीवेळी ते आले असते तर बारामती जिंकली असती. हर्षवर्धन पाटील खासदार झाले असते, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
अनेक वर्ष इंदापूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा आपल्याला मिळाली अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करून त्यांनी इंदापूरमधून मोठी आघाडी मिळवून दिली होती. यावेळी लोकसभेला आम्हाला मदत करा विधानसभेला आम्ही तुम्हाला जागा सोडतो असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपला विश्वासघात केल्याचे म्हणत आतापर्यंत आपण संयमाने वागलो. मात्र आता आपला आक्रमकपणा बघाच असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. यावेळी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.
हेही वाचा -
काँग्रेसमधील राजीनाम्याचे पडसाद, मुंबई अध्यक्ष दिल्लीला रवाना