पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा नाही तर साम, दाम, दंड, भेदाचा विजय आहे. त्यामुळे भाजपला हा विजयोत्सव साजरा करण्याचा अधिकार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे खासदार चव्हाण म्हणाले, लोकसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात देशभरात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपाला फक्त पालघमध्ये विजय मिळवता आला आहे. देशभरात समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपचा पराभव झाला आहे.
महाराष्ट्रात दोन ठिकाणी लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. त्यातील भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होती. त्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार मधुकरराव कुकडे विजयी झाले. नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जे आरोप करून खासदारकीचा राजीनामा दिला, त्या आरोपांवर एकप्रकारे या निकालातून शिक्कामोर्तब झाले आहे. हा मोदी सरकारचा मोठा पराभव आहे असं चव्हाण म्हणाले.
पालघरचा निकाल काँग्रेस पक्षासाठी धक्कादायक आहे. पालघरमध्ये झालेला पराभव मी स्वीकारतो. या निवडणुकीतही समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, असेच प्रयत्न होते. राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आमच्या सोबतच होती. त्याही पलिकडे जाऊन आम्ही विचार करत होतो. परंतु, काही कारणांमुळे हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही. पण सर्व धर्मनिरपेक्ष समविचारी पक्ष एकत्र आले असते तर आज पालघरचं चित्र वेगळं दिसलं असतं.
लोकशाही, निवडणूक आचारसंहिता आणि नैतिक मुल्यांना धाब्यावर बसवून भाजपने आपली प्रचार मोहीम राबवली. काँग्रेस पक्षाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केल्या मात्र दुर्देवाने आयोगाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. शिवसेनेचा ढोंगीपणा आज पुन्हा उघड झाला आहे. भ्रष्टाचारी आणि लाचारी या दोन्ही प्रवृत्ती एकत्र नांदत असतात याचं उदाहरण शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आहेत. कर्नाटकप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्रातही सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपचा पराभव करू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.