पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, भाजपाला घटस्फोट देणार अशी जोरदार चर्चा प्रसारमाध्यमांसह राजकीय वर्तुळात रंगली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन इथं होणाऱ्या सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं होतं. ५ वाजता उद्धव ठाकरे सेना भवनात आले, त्यांनी बोलण्यास सुरूवात केली, पालघर निवडणुकांविषयी बोलले, वनगा परिवाराबद्दल बोलले, योगीची-भाजपावर निशाणा साधला, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचे संकेतही दिले पण घटस्फोटाचा स्फोट काही केला नाही.
सत्तेतून बाहेर पडण्याचा चकार शब्दही उद्धव ठाकरे यांनी न काढता पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात घटस्फोटाची अर्थात सत्तेतून बाहेर पडण्याची रंगलेली चर्चा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी खोटी ठरवली. नेहमीप्रमाणं सेनेच्या आमदारांचे राजीनामे खिशातच राहिले नि उद्धव आल्याप्रमाणे निघून गेले.
सत्तेत एकत्र आहेत, पण एकमेकांचं जमत नाही, एकमेकांवर सडकून टीका करायची, एकमेकांना धमक्या द्यायच्या पण सत्ता काही सोडायची नाही असं भाजपा-सेना युतीच्या बाबतीतचं चित्र आहे. भाजपा-सेनेचं सुरूवातीपासूनच बिनसलं असून गेल्या काही महिन्यात दोघांमधून निखाराही जात नसल्याचं चित्र आहे.
त्यातच पालघर निवडणुकादरम्यान दोघांमध्ये ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, दोघ एकमेकांविरोधात लढले त्यावरून भाजपा-सेनेतील संबंध आणखी ताणल्याचं स्पष्ट झालं. तर पोटनिवडणुकीत नाट्य आणि गुरूवारच्या निकालानंतर हे संबंध आणखी ताणले गेल्याचं म्हणत घटस्फोटाचीच चर्चा रंगली. पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडण्याबाबत ब्र ही न काढल्यानं घटस्फोटाच्या बातम्या पेरणारेच तोंडघशी पडले.