काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयाच्या नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर कुठलाही भेद न करता सर्वांचं मोफत लसीकरण करत काँग्रेसने लोकांचे जीव वाचवले होते. आताही निर्बंध लागू करण्याआधी, लसीचे दर ठरण्याआधीच काँग्रेसने सर्वांसाठी मोफत लसीकरणाची मागणी केली होती. कारण संकटाच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडणं ही काँग्रेसची संस्कृती नाही!
हेही वाचा- केंद्रामुळेच महाराष्ट्रातील लसीकरण थांबलंय- नवाब मलिक
काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन #MVA सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयाच्या नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 28, 2021
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे आभार!#FreeVaccinationForAll
खरंतर कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने प्रत्येक नागरिकाचं मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी मोदी सरकारची होती. मात्र इथं देखील त्यांनी जबाबदारीपासून पळ काढला. परंतु त्यांनी हात झटकले म्हणून आम्हीही हात झटकणार नाही. केंद्रापासून राज्यापर्यंत काँग्रेस नेत्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच राज्यात सर्वांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर व्यापक लसीकरणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका काँग्रेसने मांडली आणि त्यासाठी पाठपुरावा देखील केला. या पाठपुराव्याचे यश म्हणूनच आज सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असून प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळणार आहे, असं बाळासाहेब थोरांनी यांनी सांगितलं.
(congress reaction on free covid 19 vaccination in maharashtra)