भारतीय जनता पार्टी सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केल्याच्या आरोपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे गुरूवारी ज्येष्ठ नेते व पक्षाचे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान, असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात होईल. भाजपा सरकारने राफेल विमान खरेदीमध्ये केलेला घोटाळा हा संरक्षण मंत्रालयाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आहेत. या घोटाळ्याविरोधात हा मोर्चा आहे, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, राफेल विमान खरेदीची संसदीय समितीकडून चौकशी केली जावी, अशा मागण्या या मोर्चादरम्यान केल्या जाणार आहेत.
या मोर्चामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत काँग्रेसचे संचार विभागाचे प्रभारी आणि हरयाणाचे आमदार रणदीप सिंह सूरजेवाला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसंच पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक व इतर पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत, असंही निरूपम यांनी सांगितलं.
हेही वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - अशोक चव्हाण
जनसंघर्षाचं वादळ भाजपची सत्ता उलथवेल - मल्लिकार्जुन खर्गे