सरकारची तीन वर्षांतील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून, लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
सरकारच्या कामगिरीचा निषेध करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपासून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला असून, देशाचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाला ८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याचदिवशी काळा दिवस पाळणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तसेच कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ असून, शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही. अटी शर्ती घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळलं आहे. राज्यात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरु असल्याचं म्हणत अशोक चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
२००८-०९ च्या कर्जमाफीत गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे. सरकारला त्याची आता आठवण का येतेय? तेव्हा विरोधक म्हणून हे काय करत आहे, असा सवालही अशोक चव्हाण यांनी विचारला. कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीची अट तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
इतिहासात कधी नाही एवढी अपमानास्पद वागणूक या सरकारने दिल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हटलं. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना इतकी अपमानास्पद वागणूक कधी मिळाली नाही. शेतकऱ्यांचा आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचा फुटबॉल झाला आणि हे मात्र फिफा खेळत बसलेस, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
हेही वाचा -
'बहुत नाइंसाफी है'! आधार नंबर एक, लाभ मात्र शेकडो शेतकऱ्यांना!!
बाॅलिवूड कलाकार काढणार गाई-म्हशीचं दूध?