मुंबई महानगरात (MMR) सोमवारी अचानक खंडीत झालेल्या वीजपुरवठ्यामागे घातपाताची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या या दाव्यामुळे वेगळंच राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवारी १२ आॅक्टोबर २०२० रोजी सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे अशा तिन्ही शहरांतील वीज पुरवठा अचानक खंडीत झाला होता. यामुळे तिन्ही शहरं जागीच ठप्प झाली होती. महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबई महानगरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला होता.
पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने लोकल ट्रॅकवरच उभ्या राहिल्या. यामुळे प्रवाशांना नाईलाजाने ट्रॅकवर उतरुन पायी प्रवास करावा लागला, रस्त्यांवरील सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला, रुग्णालयातील वीजही गेल्याने रुग्णांचे हाल झाले. अनेक ठिकाणी जनरेटरचा आधार घ्यावा लागला. मुलुंडमधील अॅपेक्स रुग्णालयात जनरेटरने पेट घेतल्याने आग लागली. तिथून अन्य रुग्णालयांत हलवण्यात आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी पाणी पुरवठा खंडीत झाला, मुंबई व ठाण्यात अनेक भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या.
हेही वाचा- मुंबई, ठाण्यातील काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित; अनेक सुविधांना मोठा फटका
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर दुरूस्तीचं काम केल्याने ३ ते ४ तासांनी हळुहळू ठिकठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत होऊ लागला. मुलुंड, ठाण्यामागील अनेक भागांमध्ये तर १४ तासांहून अधिक काळ वीज पुरवठा खंडीत होता.
या प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने उच्च स्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत वीज पुरवठा ठप्प होण्यामागील कारणं तपासण्यासोबतच पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यायची याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान वीज पुरवठा ठप्प कसा झाला? यावर सखोल तपास सुरू असतानाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. असं ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटमुळे या घटनेला वेगळंच वळण लागलं आहेत. खुद्द राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनीच यामागे घातपाताची शक्यता असल्याची भीती व्यक्त केल्याने या प्रकरणातील गांभीर्य आणखीनच वाढलं आहे. त्यामुळे या प्रकारामागचं सत्य उघडकीस यावं, अशीच अपेक्षा आहे.