राज्यातील अर्थचक्र सुरू करण्यासाठी रेड झोन वगळून आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील निवडक उद्योगधंद्यांना राज्य सरकारने २० एप्रिलपासून अंशत: सवलत देऊ केली होती. परंतु लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणताच पुन्हा एकदा नागरिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ही सवलत ताबडतोब रद्द केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कठोर निर्बंध कायम राहणार असून नागरिकांना या निर्बंधांचं पालन करावं लागणार आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन लागू आहे. परंतु लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे रेड झोन वगळता राज्यातील आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील आरोग्य सुविधा, शेतीची कामं, काही निवडक उद्योग, व्यापारी आणि आस्थापनांना लाॅकडाऊनमधून काही अटींवर मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली. सोमवार २० एप्रिलपासून ही सवलत लागू करण्यात आली.
हेही वाचा- WHO चा इशारा खोटा ठरवायचा असेल तर, असं का म्हणाले अजित पवार ?
#lockdown
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 21, 2020
कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी #लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द; लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे-प्रशासनाला निर्देश pic.twitter.com/agpxWABHXF
मुक्तपणे व्यवहार सुरू
परंतु लाॅकडाऊन अंशत: उठताच नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले. लोकांनी अनेक ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं चित्र दिसलं. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना लाॅकडाऊनचे निर्बंध न पाळल्यास ही शिथिलता रद्द केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यानुसार राज्यासाठी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द करण्यात आली आहे. तसं या क्षेत्रात लाॅकडाऊनचं पालन अधिक काटेकोरपणे पाळण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.
अधिसूचनेत दुरूस्ती
लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती मंगळवार २१ एप्रिल रोजी करण्यात आली. ही दुरूस्ती मुंबई महानगरआणि पुणे महानगर क्षेत्रासाठी लागू असेल. या दुरूस्तीनुसार १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू असेल. तर उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.
🚨Important Update🚨
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2020
In a view of large number of people commuting because of the relaxation issued vide order dated 17th april 2020 and also the imminent threat to further spread of pandemic (1/2) pic.twitter.com/jOIyXDYXV5
या सवलती रद्द
ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील. मुंबई आणि पुण्यात बांधकामे देखील बंदच राहतील तसंच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करून घ्यायचं आहे.
हेही वाचा- माॅब लिंचिंगची घटना धार्मिक नाही, आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका- उद्धव ठाकरे
राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसंच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील. मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसंच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.