पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करत लोकांना घरातच दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईल फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं. आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाच्या बाजूनं आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
'टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. यावेळी राऊत यांच्या बोलण्याचा रोख जनता कर्फ्यूवेळी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या उद्दिष्टाला हरताळ फासत रस्त्यावर केलेल्या गर्दीकडे होता.
👏👏टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020
आता आग 🔥नाही लावली म्हणजे झालं. 😅
साहेब कामाचं आणि लोकांच्या
पोटा पाण्याचं बोलां.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. 'थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर आणि कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं पंतप्रधानजी हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला,' अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020