कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi government) पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे सरकारला (thackeray government) जागं करण्यासाठी येत्या २२ तारखेला घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन निषेध नोंदण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp maharashtra president chandrakant patil) यांनी केलं आहे. 'माझं अंगण रणांगण' आणि 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलं आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय
सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात ९ मार्चला पहिला कोरोना रुग्ण (corona patient) सापडला. त्याच दिवशी केरळातही पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून पुढच्या ७० दिवसांत केरळातील कोरोनाबाधितांची संख्या १ हजारांच्या पुढं गेलेली नाही. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ४० हजारांच्या दिशेने चालली आहे. याच दिवसांत केरळातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण हे १२ च्या पुढं गेलेलं नाही. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ही १३०० ओलांडून १४०० कडे निघाली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. #माझंआंगणरणांगण #MaharashtraBachao pic.twitter.com/Urx84wT12c
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 20, 2020
असा करा निषेध
कोरोनाशी लढा देण्यात महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं हे उदाहरण आहे. या ७० दिवसांत सर्वसामान्य आणि भारतीय जनता पक्षाने हे कोरोनाचं संकट खूप मोठं आहे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका ठेवली. पण आता लोकंसुद्धा त्यांच्या मनातला राग लपवू शकणार नाहीत आणि विरोधी पक्ष म्हणून भाजपा भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे मंगळवारी राज्यातील सगळ्या तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं आहे की २२ मे रोजी मेरा आंगण, मेरा रणांगण आणि महाराष्ट्र बचाव अशा प्रकारची भूमिका घेऊन महाराष्ट्रातील लोकं आपल्या घराच्या अंगणात सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवून काळ्या फिती, काळे झेंडे, काळे मास्क, काळे शर्ट किंवा ओढण्या घेऊन ठाकरे सरकारचा निषेध करतील.
आर्थिक पॅकेज नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काय देतं याकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्र सरकारने अजून कुठलंही आर्थिक पॅकेज घोषित केलेलं नाही. हातावर पोट असणाऱ्या माणसाला सरकारने काहीतरी दिलं पाहिजे. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत. यामुळे २२ मे रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान आपल्या घरासमोर उभं राहून ठाकरे सरकारचा निषेध करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं.