लाॅकडाऊनमुळे (lockdown) महाराष्ट्राच्या विविध भागात हजारो परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत. परप्रांतीयांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. त्यामुळे लाॅकडाऊनचा कालावधी संपताच या परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या पाहिजेत. अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (railway minister piyush goyal) यांना पत्र लिहून केली आहे.
महाराष्ट्रात अडकले परप्रांतीय
अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्याने तसंच येथील बांधकाम व्यवसाय मोठा असल्याने उत्तरप्रदेश, बिहारसह इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांची (migrant worker in maharashtra) संख्या देशात सर्वाधिक आहे. हे मजूर विविध असंघटीत क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात. केंद्र सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशव्यापी लाॅकडाऊन लागू केलं. तेव्हापासून हे परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत.
हेही वाचा - परप्रांतीयांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी
साडेसहा लाख मजूर
लाॅकडाऊनमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम, सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजुरांच्या हाताला काम उरलेलं नाही. राज्य शासनाने शिबिरांच्या (food camp for migrant workers) माध्यमातून त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. तिथं त्यांना आरोग्यसेवा देखील पुरवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या शिबिरांमध्ये सध्याच्या घडीला साडेसहा लाख मजूर राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात. त्यासाठीचे नियोजन आधीच करण्याची उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांची केंद्रीय रेल्वेमंत्री @PiyushGoyal यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. pic.twitter.com/BZsh8e3uyt
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 23, 2020
घरी जाण्यास उतावीळ
मागील दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे हे परप्रांतीय मजूर आता आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास उतावळे झाले आहेत. १४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी याच उतावळेपणाचं उदाहरण आहे.
आधीच नियोजन करा
त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या परिस्थितीचा विचार करुन लाॅकडाऊनची मुदत ३ मे रोजी किंवा केंद्राने ठरविल्याप्रमाणे संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरु होतील, तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई आणि पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या (special trains) सोडाव्यात. लाॅकडाऊन संपताच हे मजूर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीच्या विशेष गाड्यांचं नियोजन आधीच करावं. जेणेकरून या मजुरांना सुरक्षित घरी जाता येईल तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.