लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आयोगाने पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील व्यक्तीची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे.
२००४, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. परंतु २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. त्यानंतर या वर्गवारीत ९१८ मतदारांची नोंद झाली होती. ५ वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आता ही संख्या २ हजार ८६ इतकी झाली आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर आणि मुंबई पूर्व या ४ मतदारसंघात अनुक्रमे ११३, १८४, ३२४ आणि १२३ तृतीयपंथाची नोंद झाली आहे. तर मुंबई उत्तर या मतदारसंघातून सर्वाधिक ३२४ तृतीयपंथीची नोंद झाली आहे.
गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथीची शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल. येत्या काही दिवसांत गौरी सावंत या तृतीयपंथी यांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क या बाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारासह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपटकलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळया क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
आगे आगे देखो होता है क्या; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सूचक विधान