शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसच्या (congress) नेत्यांकडूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. राज्यपाल घटनात्मक पदासाठी काम करण्याऐवजी भाजपचे नेते म्हणून आरएसएससाठी काम करतानाच जास्त दिसून येत असल्याचा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ज्या पद्धतीनं इथं काम करत आहेत. त्याकडं बघून ते भाजप (bjp) नेते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) काम करत असल्याचं वाटतं. हे त्यांच्याकडील घटनात्मक पदाला नक्कीच शोभनीय नाही. त्यांचं वर्तन अत्यंत दुर्दैवी आहे. शिवाय भारतीय लोकशाहीविरोधात रचलेलं हे एक षडयंत्रच असल्याचं दिसून येतंय, अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रातील सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही त्यांना जेव्हा भेटायला राजभवन इथं जातं तेव्हा आरएसएस आणि भाजपचा उदोउदो करण्यापलिकडं ते काहीच करत नाहीत. त्यांच्या या वागण्याचं कुणीही समर्थन करणार नाही, असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी सांगितलं.
हेही वाचा- “राज्यपाल असल्याचा त्यांना विसर पडलाय का”, नवाब मलिकांनी भगतसिंह कोश्यारींना सुनावलं
The way Governor Bhagat Singh Koshyari is working here, it appears that he is working for RSS, as a leader of BJP & not for his constitutional post. His behaviour is unfortunate. It seems to be a conspiracy against Indian democracy: Maharashtra Minister Nitin Raut pic.twitter.com/G08Mu7a9QX
— ANI (@ANI) August 4, 2021
कोरोना आढावा दौऱ्यावरून महाविकास आघाडी सरकार विरूद्ध राज्यपाल असा सामना पुन्हा एकदा रंगला आहे. राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसीय दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेणार आहेत. या दौऱ्याला महाविकास आघाडी सरकारने तीव्र नापसंती दर्शवत विरोध केला आहे.
एवढंच नाही, तर मंत्रिमंडळ बैठकीत या दौऱ्यावर चर्चा देखील करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारच्या सचिवांना राजभवन इथं जाऊन राजभवन सचिवांना सरकारची नाराजी कळवण्यास सांगण्यात आलं.
एवढंच नाही, तर राज्यपाल राज्यात दुसरं सत्ताकेंद्र असल्यासारखं वागत आहेत. भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यांना आता वाटत असेल की ते मुख्यमंत्री आहेत, तर तसं नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही. मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याकडे असतात, ते राज्यपाल आहेत याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केली होती.