सुधारीत नागरिकत्व कायदा (CAA) आणि ‘एनआरसी’ (NRC)वरून ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलनं सुरू असून केंद्रातील विरोधी पक्षाकडून भाजपला टीकेचं लक्ष्य केलं जात आहे. अशाच एका व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing minister Jitendra awhad) यांची सीएएवर टीका करताना जीभ घसरली. आक्रमक भाषण करण्याच्या नादात त्यांनी चक्क सत्ताधाऱ्यांचा बापचं काढला.
#WATCH Jitendra Awhad,NCP in Thane:Main Delhi ke takht se poochta hoon,ab tu maangega mujhse saboot mere deshvasi hone ka?Toh sun,jab tera baap sar jhukakar angrezon ke talwe chaat raha tha,tab mera baap phansi ke takht ko choomke inquilab zindabad ke naare laga raha tha.(18.01) pic.twitter.com/WOwKP167xQ
— ANI (@ANI) January 20, 2020
भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील धोबी तलाव येथील परशुराम टावरे स्टेडियममध्ये ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’चा विरोध करण्यासाठी पुरोगामी पक्ष, संघटना तसंच संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.
हेही वाचा- प्रस्ताव देणाऱ्याची नावे सांगा, शिवसेनेचं चव्हाणांना आव्हान
या सभेत भाषण करताना आव्हाड म्हणाले, केंद्र सरकारने आणलेला सुधारीत नागरिकत्व कायदा घटनेविरोधी आहे. या कायद्याविरोधात सर्वात पहिल्यांदा आपण ठाण्यात आंदोलन केलं होतं. केंद्र सरकार जोपर्यंत मागे घेत नाही. तोपर्यंत या कायद्याविरोधात जिथं जिथं आंदोलन होईल, त्या आंदोलनात सहभागी होईल. या कायद्यामुळे नागरिकत्व सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नसलेल्या पारधी समाजासारख्या अल्पसंख्यांक समाजाची मोठी अडचण होणार आहे. हिटलरशाही प्रवृत्तीच्या लोकांनी हा कायदा जाणीवपूर्वक लागू केला आहे. डाॅ. आंबेडकरांच्या (dr. B.R. Ambedkar) समतेला छेद देणारा हा कायदा असल्याने आंबेडकरी विचारांची गोळवलकरांच्या विचारांविरोधातील ही लढाई आहे.
केंद्र सरकारवर टीका करण्याच्या नादात आव्हाड म्हणाले, मी दिल्लीच्या तख्ताला विचारू इच्छितो, तुम्ही आमच्याकडे देशातील नागरिक असल्याचे पुरावे मागत आहात तर ऐका, जेव्हा तुमचा बाप मान खाली घालून इंग्रजांचे पाय चाटत होता, तेव्हा आमचा बाप फाशीच्या दोरीचं चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादचे नारे देत होता.
या कायद्याला विरोध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील प्रत्येक चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून या कायद्याला विरोध करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
हेही वाचा- नाईटलाइफवरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?
या कायद्याला विरोध करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील २४ जानेवारी रोजी मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय संघटनांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून ते सीएए आणि एनआरसी कायदाला विरोध करणार आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली होती.