'छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदीं के साथ', म्हणत सत्ता मिळवणाऱ्या सरकारनं पैशांसाठी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची उंची कमी केली', असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबईच्या अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाची उंची कमी केल्याचा मुद्दा विधान परिषदेत मांडताना मुंडे यांनी हा तर 'छत्रपतींच्या सर्व अनुयायांचा अपमान असून हा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. यासाठी ३३८ कोटी नाही तर ४०० कोटी खर्च झाले तरी चालतील परंतु पूर्वीच्या जिरे-टोपापासूनची उंची कमी होणार नाही, याची खात्री सरकारनं करून द्यावी, अशी मागणी करत अश्वारूढ पुतळयाची उंची आम्ही एक इंचही कमी होवू देणार नाही', असा इशारा दिला.
'शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ स्मारकाची उंची नोंद आराखड्यापेक्षा कमी करण्यात आली आहे. नवीन आराखड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जिरे टोपापर्यंतची उंची ही १२१.२ मीटर एवढी होती. ती आता ७५.२ इतकी कमी करण्यात आली आहे. ही उंची भरून काढण्यासाठी तलवारीच्या उंचीची वाढ करण्यात आली आहे, हे काय चाललं आहे' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एकीकडे सदनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होणार आहे सांगायचं आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंचीच कमी करायची. त्याला कारण काय हे महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला कळायला हवं. पैशाच्या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची उंची कमी करताय का? महाराजांच्या एकूण पुतळ्याची उंची कमी करण्याची राज्य सरकारची काय भूमिका आहे? हे स्पष्ट करावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
तलवारीची उंची वाढवायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची पूर्वीची जी उंची आहे, ती कायम राहिली पाहिजे. याबाबतीत सरकार काय भूमिका घेणार? हे स्पष्ट करावं असंही ते यावेळी म्हणाले.
अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जगात सर्वाधिक असेल. सरकारने पुतळ्याची उंची एक इंचही कमी केलेली नाही. हे स्मारक पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा राज्य शासन देईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.
केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्पचित्र पाठविण्यात आलं होतं, तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचं डिजाईन करताना समुद्रातील वारे, लाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. समुद्रात हवेचा दाब सहन करणारा पुतळा असावा अशा पद्धतीने त्याचा आराखडा तयार केला आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -