मुंबईसह महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात येत्या २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्या मोजण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावली असली, तरी यंदा लोकसभा निवडणुकीचे निकाल उशीराच लागणार आहेत.
या मतमोजणीत प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी ५ बूथवरील ईव्हीएममधील मतं आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येतील. परिणामी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या तुलनेत यावेळेस निकाल येण्यास उशीर होईल.
या लोकसभा निवडणुकीत मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिलं आहे, ते मत त्यालाच गेलं आहे की नाही हे कळावं म्हणून प्रत्येक ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडण्यात आलं आहे. यावेळेस प्रत्येक मतदारसंघात व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागला. कारण मतदारांनी मत दिल्यावर पावती प्रिंट होऊन ती खोक्यात पडण्यासाठी ७ सेकंदाचा वेळ लागत होता. एका मतदान केंद्रात सरासरी ५ बूथ होते. प्रत्येक बूथवर साधारणत: २५०० मतदार असतात. त्यापैकी निम्म्या म्हणजेच ५० टक्के मतदारांनी केलेल्या मतदानाचा वेळ मोजला तरी ८४०० सेकंद म्हणजेच १४० मिनिटे (२ तास २०) जास्त लागली.
सर्वात आधी ईव्हीएममधील मतदान फेरीनिहाय मोजण्यात येईल. प्रत्येक फेरीनंतर उमेदवारनिहाय मोजणी झालेल्या मतांची आकडेवारी जाहीर करण्यात येईल. सर्व फेऱ्या झाल्यावर प्रत्येक मतदारसंघातील ५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पावत्या यांची पडताळणी करण्यात येईल. प्रत्येक मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. म्हणजेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ३० मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी होईल. त्यामुळे अंतिम निकाल हाती येण्यास थोडासा उशीर लागू शकतो.
हेही वाचा-
५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
मतदानानंतर 'अशी' होते मतांची मोजणी