लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. यानंतर एकूण ७ टप्प्यात होणाऱ्या मतदानाची मोजणी २३ मे रोजी होणार आहे. जनतेने दिलेल्या कौलानंतर केंद्रातील सरकार अस्तित्वात येईल. मतदान केल्यानंतर नागरिक नेहमीच्या कामात व्यग्र होत असले, तरी निकाल लागेपर्यंत त्यांनी केलेल्या मतदानाला अनेक टप्प्यांतून पुढं जावं लागतं. चला जाणून घेऊया निकालापर्यंतची प्रक्रिया.
संपूर्ण मतदान झाल्यावर इव्हीएम मशीन्स सील केल्या जातात. मतदानाची वेळ संपल्यावर निवडणूक आयोगाद्वारे एका व्यक्तीला इव्हीएम मशीन सील करण्यासाठी पाठवलं जातं. त्यामुळं इव्हीएम मशीनसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड होत नाही.
इव्हीएम मशीन पूर्णपणे सील केल्यावर सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं स्ट्राँग रुममध्ये पाठवल्या जातात. या रुममध्ये कॅमेरे असून मतमोजणीपर्यंत या मशीन त्या रुममध्ये ठेवण्यात येतात. तसंच त्याठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात येतो. त्याशिवाय या रुममध्ये निवडणूक आयोगाद्वारे नेमलेल्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला जाण्यास मनाई आहे.
इव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये ठेवल्यावर जिल्हा प्रशासन या रुमला सील करते. या रुमला मतमोजणीच्या दिवशी खुलं केलं जातं. त्याशिवाय इव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात केले जातात.
मतमोजणीसाठी सर्व इव्हीएम मशीन स्ट्राँग रुममधून एका ठिकाणी आणल्या जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाते.
निवडणूक आयोगानं नेमलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मतांची मोजणी करण्यात येते. मतमोजणी केंद्रावर इव्हीएम मशीनला लावलेलं सील खोलण्यात येतं. दरम्यान, या अगोदरचं जर इव्हीएम मशीनला लावलेलं सील खुलं असेल तर, त्या मशीनमधील मतं मोजली जात नाही. त्याशिवाय, प्रत्येक मशीनमधील मतांची मोजणी झाल्यावर निकाल जाहीर केला जातो.
मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यावर सर्व इव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्येचं ठेवल्या जातात. इव्हीएम मशीन ४५ दिवसांसााठी स्ट्राँग रुममध्ये जमा केल्या जातात. मात्र, व्हीव्हीपॅट मशीन्स ४५ दिवसांसाठी ठेवल्या जात नाही.
हेही वाचा -
नेस वाडियाला जपानमध्ये २ वर्षांची शिक्षा, अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक
मुंबईच्या ‘मत’टक्क्यात वाढ; ३० वर्षातलं सर्वाधिक मतदान