राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. त्याकरीता राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. परंतु काँग्रेसचं अजूनही तळ्यात-मळ्यातच सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची मुदत राज्यपालांनी दिली होती. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर दाखल झालेल्या शिवसेना नेत्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं पाठिंब्याचं पत्र वेळेत मिळू शकलं नाही. त्यामुळे शिवसेनेला मिळालेली संधी वाया गेली.
Ajit Pawar,NCP: Whatever decision will be taken will be taken collectively, so we were waiting for Congress response yesterday but it didn't come, we can't decide on it alone. There is no misunderstanding,we contested together and are together. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/KCkIJYFMpJ
— ANI (@ANI) November 12, 2019
यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार म्हणाले की,
एकट्या राष्ट्रवादीनं पत्र देऊन काहीही झालं नसतं, आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट बघत होतो. काँग्रेसचे आमदार जयपूरला आणि नेते दिल्लीला असल्यामुळे रात्री उशीरापर्यंत त्यांचा निर्णय झाला नव्हता. परिणामी शिवसेनेला वेळेत पत्र देता आलं नाही. राष्ट्रवादीला आता राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं आहे. आमची सत्तास्थापनेची तयारी आहे. पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नाही. जयपूरहून काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले असून आज ते महाराष्ट्रात येतील. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढल्याने दोघांनी मिळून निर्णय घेण्याची गरज आहे.
दरम्यान, सत्तास्थापनेवर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत कोअर कमिटीची बैठक होत आहे. तर काँग्रेसची दिल्लीतील कोअर कमिटीची बैठक रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचा दावा करण्यास अयशस्वी ठरली, तरी केंद्राच्या दादागिरीसमोर न झुकण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याविरोधात पवार दौरा करणार असल्याचं राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा-
राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?
शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा, मात्र वेळ निघून गेली...