विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने राज्यभरात आतापर्यंत तब्बल ८० कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, सोने व चांदीचे दागिने आदींचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे, मद्य, आकर्षक भेटवस्तू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान दागिन्यांचं आमिष दाखवलं जातं. अशा उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी यावर्षी प्रथमच राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० पथके राज्यभरात स्थापन केली आहेत. स्थानिक पोलिस उपायुक्त आणि ग्रामीण विभागात एसपींच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कार्यरत आहेत.
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरू केली आहे. यासोबत अवैध शस्त्र बाळगणे, मद्य वाहतूक-विक्री आदींप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहे. आतापर्यंत या भरारी पथकांनी राज्यांत एकूण ८० कोटी ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यात २६ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम, तर १६ कोटी ६९ लाख रुपयांच्या अवैध दारूचा समावेश आहे. तसंच भरारी पथकाने १७ कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि १९ कोटींचे सोेने व चांदीचे दागिने पकडले आहेत. निवडणुकीत मतदारांना पैशांचं प्रलोभन दाखविलं जाऊ शकतं. हे प्रकार रोखण्यासाठी झोपडपट्टी वा इतर परिसरात नजर ठेवली जात आहे.