Advertisement

“कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणण्याची इच्छा नव्हती पण; ही लाट प्रचंड मोठी”

कोरोनाचं हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांना संकटाची जाणीव करून दिली.

“कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणण्याची इच्छा नव्हती पण; ही लाट प्रचंड मोठी”
SHARES

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावं अशी इच्छा नव्हती. पण आताची परिस्थिती फार विचित्र आहे. कोरोनाचं हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन लागू करण्यामागची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

कुणाच्याही विरोधात नाही

लॉकडाऊन किंवा निर्बंधांचं हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आलं आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावं. त्यांचं नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनाही कोरोना (coronavirus) नियमांचं काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये बेड्सची संख्या ७ ते ८ हजार होती. ही संख्या आता पावणेचार लाखांपर्यंत वाढविली आहे. जम्बो कोविड सेंटर्स काढली. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. 

लसीकरणाची गती मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. २५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. पण ती नाकारण्यात आली. आपल्या मागणीवरून आता ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत आहे. पण लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात ३ दिवसांत बंद पडू शकतं लसीकरण, फक्त १४ लाख डोस शिल्लक

पहिला घाला मुंबईवर

व्यापाऱ्यांनीच दिलेल्या माहितीनुसार मुंबईतच कामगारांची संख्या लाखोंची असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या कामगारांच्या प्रवास, येण्या-जाण्यामुळे, संपर्कामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मुंबई (mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसरा हल्लाही आपल्यावर झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणं-जाणं मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. 

त्यासाठी यापूर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केलं होतं. खरेतर, दुकाने २४ तास उघडी ठेवा, असं आवाहनही केलं होतं. जेणेकरून गर्दी कमी होईल. आताही हेतू दुकाने बंद करणं हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. यापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केली होती. यात धारावी पॅटर्नचं जगभर कौतुक केलं होतं. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे.

रस्त्यावर उतरण्याची भाषा नको

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, तुमच्या सूचनांचा स्वीकार केला, तर कामगार-कर्मचाऱ्यांना तुमच्या कुटुंबातील समजून त्यांच्या कोविड-चाचण्या करण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्यांच्या येता-जातानाची काळजी घ्या. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचं नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी वीरेन शहा, बी. सी. भरतीया, जितेंद्र शहा, विनेश मेहता, ललित गांधी, मोहन गुरनानी यांनी म्हणणं मांडलं. आताच्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी. व्यापाऱ्यांचं काम चालू राहील आणि विषाणू संक्रमण रोखण्यासाठीचे नियमांचं काटेकोर पालन होईल, अशा उपाययोजना करण्याची मागणी करतानाच, ब्रेक दि चेनला सहकार्य करू असं सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा