प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतानाच काँग्रेसने शेतकरी आंदोलनावर आडमुठी भूमिका घेणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला आहे. प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये याकरिता लढणे हाच संकल्प ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योग्य आहे, असं मत महाराष्ट्र काँग्रेस (congress) कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केलं आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी मंगळवारी दिल्लीत पोहोचले. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसेचं गालबोट लागलं आहे. परवानगी दिलेल्या मार्गाने पोलीस जाऊ देत नसल्याचा दावा करत काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर तलवारी उपसल्या आहेत. यामुळे परिस्थिती चिघळली आहे.
प्रजासत्ताक दिनीच देशाच्या राजधानीतील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने साऱ्या देशाचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं आहे. त्यावर टीका करताना सचिन सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. शिवाय पद्म पुरस्काराच्या निवडीवरून देखील निशाणा साधला आहे.
हेही वाचा- म्हणून शेतकरी शिष्टमंडळाला भेटलो नाही, राज्यपालांचा खुलासा
राज्य सरकारने ९९ नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली त्यामध्ये केवळ पद्मभूषण साठी सिंधुताई सपकाळ यांचे दिलेले नाव मोदी सरकारने लक्षात घेतले. त्यातही सिंधुताईंना पद्मश्री देण्यात आली. यामध्ये भाजपाशी व संघाशी जवळीक हाही निकष होता. युपीएल चे अध्यक्ष त्याच प्रकारे आले असे दिसते pic.twitter.com/Ug0RSVjLJ3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 26, 2021
प्रजासत्ता ही मोदीसत्ता होत चालली असून गणतंत्र हे संघतंत्र होऊ नये याकरिता लढणे हाच संकल्प ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योग्य आहे. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो हे म्हणताना तो चिरायू राहावा ही जबाबदारी आपली आहे हे लक्षात ठेवा! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज्य सरकारने ९९ नावांची शिफारस पद्म पुरस्कारांसाठी केली. त्यामध्ये केवळ पद्मभूषणसाठी सिंधुताई सपकाळ यांचं दिलेलं नाव मोदी सरकारने लक्षात घेतलं. त्यातही सिंधुताईंना पद्मश्री देण्यात आली. यामध्ये भाजपाशी (bjp) व संघाशी जवळीक हाही निकष होता. यूपीएलचे अध्यक्ष त्याच प्रकारे आले असं दिसतं, असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
जे युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीचा भाजपाशी अतिशय जवळचा संबंध आहे. या कंपनीच्या संचालक मंडळावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे सख्खे भाऊ आहेत व मागील अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी कार्यरत आहेत. याच कंपनीच्या आवारात निवडणूक आयोगाने धाड टाकली होती. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांसह मी स्वतः तिथं उपस्थित होतो. तिथं ६ कोटी रुपयांचे अनधिकृत प्रचार साहित्य सापडलं होतं. त्यानंतर हे साहित्य निवडणूक आयोगाकडून सील करण्यात आलं होतं. हे साहित्य नरेंद्र मोदी यांचं होतं, अशी माहिती देखील सचिन सावंत यांनी दिली आहे.
(maharashtra congress leader sachin sawant slams modi government over padmashree award name selection)