कोरोनावरील उपचारात रेमडेसिवीर हे एक महत्त्वाचं औषध आहे. परंतु या औषधाच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत राहील याकडे राज्य सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे.
रेमडेसिवीरच्या तुटवड्याबद्दल देवेंद्र फडणवीस लिहितात की, राज्यात दर दिवशी सुमारे सरासरी २० हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्त्वाचं औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे किती दावे करत असले, तरी रुग्णालयांकडून मात्र टंचाईचच कारण रुग्णांना सांगितलं जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रुग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितलं जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
हेही वाचा - कमी कोरोना चाचण्यांमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर- देवेंद्र फडणवीस
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबवली. परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषधसाठा परत करावा लागला, असं वृत्त माध्यमांमध्ये आलं आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा धंदा सुरू केला आहे. एकिकडे गरीब रुग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसंच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसंच खासगी रुग्णालयांतसुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावं. याबाबत तातडीने प्रशासनाला निर्देश देऊन गरीब रुग्णांचे प्राण वाचवावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा - राऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण