विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक महिना उलटल्यावर अखेर काँग्रेसने मंगळवारी आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी थोरात यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबईतील जे. डब्ल्यू मेरिअट हाॅटेलमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत गटनेते पदासाठी थोरात यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव सर्व आमदारांनी एकमताने मंजूर केला. त्यानंतर त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा खर्गे यांनी केली.
काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करून सर्वांनी त्यास मान्यता देऊन ठराव मंजूर केल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्षा मा. सोनिया गांधी, अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते व सर्व आमदारांचे आभार मानतो: आ. बाळासाहेब थोरात (@bb_thorat) pic.twitter.com/dt2Bhh2OwG
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 26, 2019
याआधी भाजपने विधीमंडळ गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेने एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांची गटनेते म्हणून निवड केली होती. परंतु अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांची या पदावरून उचलबांगडी करत राष्ट्रवादीने त्यांच्या जागी गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नेमणूक केली आहे.
परंतु तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीचा गटनेता कोण? यावरून सध्या खल सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला बुधवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याआधीच राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हिप काढण्याचा अधिकार कुणाकडे हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा-
व्हिप म्हणजे काय? गटनेता कसं ठरवणार सरकारचं भवितव्य?
राष्ट्रवादीचा गटनेता कोण? संभ्रम अजूनही कायम