शहरांतील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. मात्र सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी कांदा परवडत नसेल तर लसूण किंवा मुळा खा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातच नव्हे देशातील अनेक भागात अतिवृष्टीचा फटका कांद्याच्या पिकाला देखील बसला आहे. यामुळे ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी कांद्याचे दर वाढले आहेत. कांदा हा सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने कांद्याला मोठी मागणी असते. परंतु बाजारातच कमी आवक असल्याने काही दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये किलो असलेला कांदा ७० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत कांदा शंभरी गाठेल, असंही म्हटलं जात आहे. ( maharashtra state minister bacchu kadu reacts on high price onion)
हेही वाचा - परतीच्या पावसाचा कांद्याच्या पिकाला फटका
त्यावर अमरावती इथं बोलत असताना केंद्र सरकारनं इराणमधून नुकताच कांदा आयात केला आहे. परिणामी देशभरातील कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्यांनी बोंबलू नये. कांद्याचे भाव वाढलेच पाहिजे कारण ७० वर्षांचा अनुशेष आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी मुळा, लसूण खावा, असा अजब सल्ला बच्चू कडू यांनी सर्वसामान्यांना दिला.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या पिकांचं नुकसान झालं आहे. दिवाळीनंतर बाजारात येणारा कांदाही पावसात भिजला आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याची पुढे टंचाई भासणार आहे.
घाऊक बाजारात सध्या कांद्याच्या दररोज ५० ते ५५ गाड्या येत आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून कांद्याचे दर १० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर या तुटवड्यामुळे दर वाढत जाऊन ७० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण