Advertisement

कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं? राज ठाकरेंनी सांगितला उपाय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी देखील आपल्या महाराष्ट्रसैनिकांना उद्देशून काही सूचना केल्या आहेत.

कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं? राज ठाकरेंनी सांगितला उपाय
SHARES

कोरोनाचं संकट (coronavirus) महाराष्ट्रात हातपाय पसरत असल्याने या व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? याबद्दलची माहिती सरकारी पातळीवरून नागरिकांना दिली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी देखील आपल्या महाराष्ट्रसैनिकांना उद्देशून काही सूचना केल्या आहेत. या सूचनांचं पालन करून राज्यातील जनतेला धीर देण्याचं तसंच त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना केलं आहे. 

फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात,... 

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो,

आत्तापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही.

महाराष्ट्र सैनिकांनी खालील गोष्टी करायला पाहिजेत:

१) आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे.

२) आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.

हेही वाचा- Coronavirus Update: महाराष्ट्रात ‘या’ पळवाटेने येताहेत कोरोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिली विमानतळाला भेट

३) आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी.

४) आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकार्याचीच असावी. संघर्षाची नव्हे.

५) आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.

६) ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.

७) महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी.

८) सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या.

९) आणि हो, ह्या सगळ्यात तुम्ही तुमची, तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्या. बाहेर जाताना मास्क लावा, 'सॅनिटायझर'ने हात स्वच्छ करत रहा आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणताही संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमचं आयुष्य हे माझ्यासाठी, आपल्या पक्षासाठी मोलाचं आहे हे विसरू नका.

आपला नम्र,

राज ठाकरे.

असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा- Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा