येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला हरण्याची भीती वाटतेय. म्हणूनच लोकसभेसोबत ११ राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्याचं खूळ भाजपाच्या डोक्यात आल्याचं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीकेची तोफ डागली. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज यांनी ही टीका केली.
सध्या देशात 'वन नेशन वन इलेक्शन' ची चर्चा जोर धरू लागली आहे. एका बाजूला मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रक्रियेसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल असं म्हटलेलं असताना, भाजपा आपल्या स्वार्थासाठी एकत्र निवडणुकांचा घाट घालू पाहतेय.
मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजपा पुन्हा निवडून येणार नाही, अशी भीती वाटत असल्यानेच हा एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात असल्याचं राज म्हणाले.
आमिर खान याने पाणी फाऊंडेशनच्या माध्यातून चांगली कामे केल्याचं मला अशोक चव्हाण म्हणाले. लोकसहभागातून १ लाख २० हजार विहिरी बांधण्यात आल्या असतील, तर सरकार काय करतंय. सरकारी अधिकारी जर आमिर खानसाठी काम करत असतील, तर सरकारसाठी का नाही? मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अपयश आमिर खानच्या आड लपवू नये, असं म्हणत राज यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला.
या कार्यक्रमात मी जे बोललो ते अजित पवारांना उद्देशून बोललो नाही. राज्यात पाण्याची समस्या १९६० पासून सुरू आहे. अजित पवारांनी माझं बोलणं मनाला का लाऊन घेतलं हे मला माहित नाही, असं म्हणत राज यांनी पवारांच्या नाराजीवरही मतप्रदर्शन केलं.
हेही वाचा-
६० वर्षांतला सिंचनाचा पैसा गेला कुठं? राज ठाकरेंनी मुख्यमंत्री, अजितदादांना सुनावलं
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवणं बंद करा! उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठणकावलं