महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षेत मागील दोन-तीन वर्षांपासून बोगस (डमी) विद्यार्थी बसवून उमेदवारांची निवड होत असल्याचं प्रकरण अतिशय गंभीर अाहे. त्यामुळे या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
विधान परिषदेत नियम ९३ अन्वये त्यांनी दिलेल्या सूचनेवर उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी या प्रकरणाचा जलदगतीने तपास करण्यासाठी सीआयडी अंतर्गत एसआयटी स्थापन केल्याची माहिती दिली.
त्यावर धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी करावी, अशी मागणी केली. एमपीएससीच्या परीक्षेला बसणारे लाखो विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील काही दिवसांपासून सातत्याने आंदोलने करीत आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणीही मुंडे यांनी केली.
यावर उत्तर देताना मदन येरावार यांनी या प्रकरणी २४ आरोपींना अटक केली आहे, या रॅकेटच्या माध्यमातून नोकरीस लागलेल्या उमेदवारांवरही कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं. या पुढील काळात परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसवून हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी उपायोजना केल्या जात असल्याचं ते म्हणाले.
हेही वाचा-
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मुंबईत आक्रोश
उच्च न्यायालयाने एमपीएससी संदर्भातील याचिका निकाली काढली