मुंबई काँग्रेसमध्ये यापुढं गटातटाचं राजकारण जराही खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देतानाच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिले.
लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर देवरा यांनी सोमवारी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पहिल्यांदाच आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, भाई जगताप सहीत ४ लोकसभा मतदारसंघातील नेते उपस्थित होते. परंतु मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष दौऱ्यावर असल्याकारणाने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना देवरा म्हणाले, भाजपा-शिवसेना सरकारने मागील ५ वर्षांत राज्यात कुठलीही विकासकामे केलेली नाहीत. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारला वैतागलेली आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र मिळून काम करत या सरकारला सत्तेवरून हटवायचं आहे.
जगाच्या नकाशात मुंबईला योग्य स्थान मिळण्यासाठी कुठल्या योजना आखल्या पाहिजेत, हे जाणून घेण्याकरीता काँग्रेसच्या नेत्यांनी विकासाभिमुख अर्थशास्त्रज्ञ, सामाजिक विषयांचे अभ्यासक तसंच नागरिकांची मदत घ्यावी. त्यातून मुंबईसाठी 'व्हिजन डॉक्युमेट' तयार करावं, असं देवरा म्हटले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार मुंबईत प्रत्येक झोपडीधारकाला ५०० चौ.फू. चं घर द्यायचं झाल्यास राज्यात काँग्रेसची सत्ता आली पाहिजे. त्यादृष्टीने विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील ३६ जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मेहनत सुरू ठेवली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. लोकसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात अनेक नेत्यांनी काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु आता गटातटाचं राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. यापुढं काँग्रेसमध्ये केवळ एकच गट असेल, तो म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा गट. प्रत्येकाने पक्षशिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.
हेही वाचा-
५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या खोडसाळपणाच्या- आनंदराज आंबेडकर