मुंबईत महापालिका अधिकारी आणि बिल्डरांमध्ये 'दोस्ती'चे संबंध असल्यानेच बिल्डरांच्या अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा केला जातो. त्यातूनच अॅन्टाॅप हिलसारखी दुदैवी घटना घडते. त्यामुळेच लॉयड्स इस्टेट इमारतीतील रहिवाशांनी दोस्ती बिल्डरच्या कामाविरोधात तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली.
महापालिका अधिकारी आणि बिल्डरांमधील हितसंबंध जगजाहीर आहे. त्यातूनच रहिवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होतात. लॉयड्स इस्टेट इमारतीसमोरच दोस्ती बिल्डरच्या सुरू असलेल्या कामामुळे तिथला रस्ता खचत होता. याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी कसं काय दुर्लक्ष केलं, रहिवाशांनी तक्रार करूनही त्यांनाच धाक का दाखवण्यात आला? याची उत्तर मिळायला हवीत. त्यासाठी आधी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी, असं निरूपम म्हणाले.
मुंबई महापालिका दरवर्षी विविध विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही मुंबईतील रहिवाशांना पायाभूत सोई-सुविधाही उपलब्ध होत नाहीत. पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबलं, याला जबाबदार कोण? मग नालेसफाईसाठी खर्च केलेले ५२२ कोटी रुपये कुठे गेले? असा प्रश्न विचारत निरूपम यांनी या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.
आणीबाणी हा चांगला निर्णय नव्हता हे माहीत आहे. काँग्रेसने त्याची माफीही मागितली आहे. मोदींना त्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही, कारण सद्यस्थितीत देशात मोदी आणि शहा यांच्याशिवाय कुणाला बोलूच दिल जात नाही हे कसलं स्वतंत्र आहे. ही तर एकप्रकारे आणीबाणीच आहे.
मोदी यांनी मुंबईला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक दिलं. शिवसेना आणि भाजपमधील ही सेटिंग आहे. शिवसेनेला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मोदी मुंबईत असल्याने त्यांनी व्हीआयपी रस्ते सोडून मुंबईत फिरावं, तेव्हा मुंबई किती स्वच्छ आहे हे कळेल.
हेही वाचा-
'ती' ३२ मजली इमारत राहण्यास योग्य?
अॅन्टाॅप हिलमधील लॉयड्स इस्टेट इमारतीला तडे, दोस्ती बिल्डरविरोधात गुन्हा दाखल