लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. मुंबई काँग्रेसमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीचं राजकारण पून्हा एकदा समोर आलं आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मुंबईतूनच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकला असल्याचं कळतंय. निरूपम यांना हटवून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवावी, असा आग्रह या नेत्यांनी खरगे यांच्याकडे केला आहे.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मुरली देवरा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे समर्थक सध्या मिलिंद देवरा यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत आहेत. गुरूदास कामत यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे समर्थक सध्या मुंबई काँग्रेसचे सरचिटणिस धर्मेश व्यास यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यरत आहेत. संजय निरूपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मिलींद देवरा तसंच गुरूदास कामत यांना पक्ष संघटनेच्या प्रक्रियेपासून कटाक्षानं दूर राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोन्ही गट कमालीचे नाराज होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही गटातील कार्यकर्ते बऱ्यापैकी निष्क्रीय राहिले होते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच मुंबई काँग्रेसमधील वाद चवाट्यावर आला आहे. याबाबत स्वतः मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. तर प्रिया दत्त यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये आलबेल नाही हे दिसून आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरात वातावरण तापलं असताना अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला नक्कीच फटका बसू शकतो. या पाश्र्वभूमीवर माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार कृपाशंकर सिंह, आमदार नसिम खान, वर्षां गायकवाड आणि अन्य काही नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत खरगे यांची भेट घेतली. मुंबईत किमान तीन-चार जागा निवडून याव्यात असे वाटत असेल, तर निरुपम यांना बदलून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची निवड करावी, असा आग्रह धरल्याचे समजते. वाद मिटवणयासाठी निरूपम यांच्या गटाला ही दिल्लीत बोलवल्याचं कळतं.
हेही वाचा