भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवायचं असेल, तर शिवसेनेसोबत (shiv sena) जायला हरकत नाही, असं मत अल्पसंख्यांक प्रतिनिधींनी मांडल्यानंतरच काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) शिवसेनेसोबत हातमिळवणी करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकार स्थापन केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं. गुरूवारी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी नवी आघाडी कशी आकाराला आली? त्याचा उलगडा केला.
तत्पूर्वी भाजप हा मुस्लिमांचा (muslims) सर्वात मोठा शत्रू असून भाजपला सत्तेपासून रोखण्याचा मुस्लिम बांधवांचा आग्रह असल्यानेच आम्ही शिवसेनेसोबत महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी झालो, असं विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केलं होतं. यावरून चर्चा सुरू असताना पवार यांनी एकप्रकारे चव्हाण यांच्या वक्तव्याला पुष्टी दिली.
केंद्र सरकारचे आज समाजातील पिछडलेल्या वर्गाकडे लक्ष नाही. या वर्गासाठी परिवर्तन करण्याचे काम आपण केले पाहिजे. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे ते ठराविक समाजाचा विचार करून निर्णय घेण्याचे काम करत आहेत. बहुसंख्य लोकांना याची जाणीव नाही. pic.twitter.com/fwlCNTorhP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2020
हेही वाचा- काहींना आता हिंदुत्वाची पालवी फुटलीय- राऊत
देशात ५ वर्षांपूर्वी भाजप सत्तेत येण्याआधी आणि आताची स्थिती यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. सुधारीत नागरिकता कायदा (caa) आणि एनआरसीवरून (nrc) देशात सध्या वाद सुरू आहे. केंद्र सरकारचं समाजातील मागास वर्गाकडे लक्ष नाही. केवळ ठराविक समाजाचा विचार करूनच निर्णय घेण्याचं काम हे सरकार करत आहे. केंद्र सरकार सुरू एनपीआर अंतर्गत सुरू करत असलेल्या जनगणनेत जन्माच्या नोंदीसोबतच गावाची नोंदही आवर्जून करण्यात येणार आहे. पण जो भटका समाज आहे, ज्याच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत, त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.
क्रिकेट क्षेत्रात काम करत असताना मी पाकिस्तानमध्ये बैठकीला गेलो होतो. तिथं मला असे अनेकजण भेटले ज्यांचा एकतरी नातेवाईक भारतात आहे. त्यांना भारतातील आपल्या नातेवाईकांना भेटण्याची मनापासून इच्छा आहे. परंतु ते केवळ मुस्लिम असल्याने त्यांना भारतात येण्यास परवानगी नाकारली जाते, असं पवार म्हणाले.
जनगणनेत प्रत्येकाच्या जन्माची नोंद करण्याचा निर्णय होत आहे. जन्म झालेल्या गावाची देखील नोंद होईल असे पाहण्यात येत आहे. पण जो भटका समाज आहे त्याच्या जन्माची कोणती नोंद असेल का? त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल का? नाहीतर त्याच्यावर अन्याय होणार आहे. pic.twitter.com/q1ChBNEXmV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 23, 2020
हेही वाचा- रोहित पवार यांनी अमित ठाकरेेंना दिल्या शुभेच्छा
जेव्हा शिवसेनेसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा विचार आला तेव्हा, आम्ही त्यावर बरीच चर्चा केली. केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतील अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या. त्यातील बहुतेक सगळ्यांनीच या आघाडीचं स्वागत केलं. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने आघाडी करण्यासोबतच ही आघाडी पुढे नेण्यास आमची काहीच हरकत नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेसोबत आघाडी करताना भाजपला तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दूर ठेवा, असंच सर्वांचं म्हणणं होतं, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.