राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पत्र लिहित राजदंड मतदारसंघात घेऊन जाण्याची परवानगी मागितली आहे. राजदंड उचलल्यानंतर सभागृह तहकूब झालं पाहिजे. असं असताना अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत गदारोळात राजदंड उचलल्यानंतरही कामकाज सुरू होतं. तेव्हा राजदंडाचं महत्त्वच संपणार असेल; तर राजदंड नेमका कसा असतो? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळं राजदंड मतदारसंघात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, असं आव्हाडांनी पत्रात नमूद केलं आहे.
मंगळवारी अधिवेशनात मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर विरोधक आक्रमक झाले. आमदारांना राजदंड पळवला, अध्यक्षांच्या दिशेनं कागदं भिरकावली. प्रथेनुसार राजदंड हा विरोधकांचं शेवटचं हत्यार असतं. आपलं म्हणणं सत्ताधार्यांकडून एेकून घेतलं जात नसेल तेव्हा विरोधकांना राजदंड उचलावा लागतो. तर राजदंड उचलल्यानंतर कामकाज तहकुब केलं जातं. पण मंगळवारी मात्र राजदंड उचलल्यानंतरही कामकाज सुरूच होत असं म्हणत विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हीच नाराजी त्यांना पत्रातून उपरोधिकपणे व्यक्त केली आहे. राजदंडाचा सन्मान होणार नसेल, राजदंडाचं महत्त्वचं संपणार असेल, राजदंड शोभेची वस्तू राहणार असेल तर तो राजदंड आपल्याला मतदार संघात घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. अनेकांना राजदंड पाहण्याची उत्सुकता आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा-
आरक्षण सादर करण्यावरून विरोधकांमध्येच मतभेद
आरक्षणावर सरकारचा वेळकाढूपणा - विखे पाटील