गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत! मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही! निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-लॉकडाऊन आणि आता हे संकट! केवळ काही जिल्ह्यांचा प्रश्न असल्याने भरघोस मदत राज्य सरकारने करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
रायगड जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, तौंते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन घेतला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ८ ते १० हजार घरांचं नुकसान झालं आहे. साधारणत: ५ हजार हेक्टर क्षेत्रफळातील फळपिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जवळपास २०० शाळांचं नुकसान झालं आहे.२५ वैद्यकीय सुविधांचं नुकसान झालं आहे. ६०० गावांपर्यंतच्या वीज पुरवठा यंत्रणेचं नुकसान झालं आहे. १७२ गावं अजूनही अंधारात आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. ४ मृत्यू देखील झाले आहेत. बोटींचं नुकसान झालं आहे. या सगळ्यांचे पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा- “माझा दीड वर्षांचा अनुभव आहे, मी घरातूनच राज्य चालवतोय…”
❌गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून मिळाले नाहीत!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
❌मोठ्या घोषणा झाल्या, पण, अजूनही त्याची पूर्तता नाही!
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना-लॉकडाऊन आणि आता हे संकट!
केवळ काही जिल्ह्यांचा प्रश्न असल्याने भरघोस मदत राज्य सरकारने करावी, अशी आमची अपेक्षा आहे! माध्यमांशी संवाद... https://t.co/TxO2KKJqbK
निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस देखील आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नव्हती. त्यातच पुन्हा हे नुकसान झाल्याने आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी कोळीबांधवांनी केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस राज्य सरकारने नुकसान भरपाईची घोषणा केली, पण त्याची पूर्तता केली नाही. वाड्याच्या वाड्या उद्ध्वस्त झालेल्या असतानाही झाडामागे ५ ते १० रुपये लोकांना मिळाले होते.
एकिकडे लाॅकडाऊन सुरू आहे. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहे. अशा परिस्थितीत वर्ष व्हायच्या आतच दुसरा झटका लोकांना बसला आहे. हा काही सगळ्या जिल्ह्यांचा प्रश्न नाही, तर केवळ ४ ते ५ जिल्ह्यांचाच आहे. काही ठिकाणी कमी प्रमाणात तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तेव्हा सरकारवर मोठा आर्थिक बोजा देखील पडणार नाही. म्हणूनच सरकारने या ठिकाणी भरघोष मदत केली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(opposition leader devendra fadnavis demands financial aid for cyclone tauktae affected districts in maharashtra)